मुंबई – ग्रामपंचायत निवडणुकीत 1141 पैकी आतापर्यंत हाती आलेल्या निकालांत सर्वाधिक 397 जागा जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व भाजपा कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वावर देशातील जनतेचा पंचायतपासून पार्लमेंटपर्यंत भक्कम विश्वास आहे, हे आज पुन्हा या निकालांनी अधोरेखित झाले. सुमारे 397 जागा जिंकून भाजपा क्रमांक 1 चा पक्ष बनला, तर भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वातील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ मिळून एकूण 478 जागांवर विजय संपादन केला. महाविकास आघाडीच्या एकत्रित आकड्यांपेक्षा आमची युती कितीतरी पुढे आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
या घवघवीत यशाबद्दल दोन्ही पक्षांचे सर्व विजयी उमेदवार, अहोरात्र झटणारे कार्यकर्ते, पदाधिकारी अशा सर्वांचे देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांच्या मार्गदर्शनात, महाराष्ट्र भाजपाची धुरा सांभाळणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतरची ही पहिली मोठी निवडणूक होती. या यशाबद्दल मी त्यांचेही मन:पूर्वक अभिनंदन करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपकडून बराच विचार करण्यात आला. विशेषत: कार्यकर्ते आणि मुंबई युनिटचं मत होतं की, आम्ही निवडणूक लढवली पाहीजे. मुरजी पटेलांसारखा उमेदवार ज्याने अपक्ष म्हणूनही ४५ हजार मतं घेतली. तो उमेदवार आम्ही उभा केला होता. त्यामुळे आम्हाला निवडून येण्याची पूर्ण खात्री होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हेही वाचा : प्रत्येक झोपडपट्टीधारकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा, राज्यपालांची बिल्डर्सना आवाहन