मुंबईः राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडलाय. त्या अर्थसंकल्पावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीकास्त्र सोडलंय. कळसूत्री सरकारनं विकासाचा जो पंचसूत्री मांडण्याचा प्रयत्न केलाय. या पंचसूत्रीनं काही होणार नाही. कारण या सरकारनं महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्त्वात विलीन केलेले आहे, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय. विधानसभेच्या बाहेर येत देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतलीय. त्यावेळी ते बोलत होते.
दोन वर्षांत महाराष्ट्रातल्या दीन दलित, गोरगरीब आदिवासी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, बारा बलुतेदार सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारनं केलंय. आताचं जे बजेट या ठिकाणी मांडलं हेही कुठल्याही प्रकारे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देऊ शकत नाही. बजेटमुळे वृत्तपत्रात चौकट यावी इतपत चार बातम्या तयार होऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त कुठलीही दिशा या बजेटला नाही, असंही म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पावर टीकास्त्र डागलंय.
राज्य विशेषतः मागील बजेटच्या घोषणा पुन्हा या बजेटमध्ये करायच्यात. चालू कामांच्याच घोषणा या बजेटमध्ये करायच्या. आमच्या सरकारच्या काळात सुरू असलेल्या योजनाच पुन्हा या बजेटमध्ये सांगायच्या. पहिल्या वर्षामध्ये आमच्या सगळ्या योजना बंद करणारं सरकार आता त्याच योजनांचा विस्तार करून त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतेय. समृद्धी महामार्गाचा विरोध स्वतः मुख्यमंत्री आणि शरद पवारांनी केला होता. मुंबईतली मेट्रो असेल, मेट्रो थ्री असेल. ट्रान्सहार्बर लिंक असेल. वेगवेगळे जे प्रोजेक्ट आहेत. त्या सगळ्या प्रोजेक्टला बुलेट ट्रेनसहीत विरोध करणारं सरकार आता त्याच संदर्भात पुन्हा घोषणा करतंय हे पाहून आनंद करावा की दुःख ठेवावं हे समजत नाही. शेतकऱ्यांना या बजेटनं काही दिलं असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय.
तसेच काही घोषणा सोडल्या तर या अर्थसंकल्पाने काय दिलं नाही. देशातल्या 22 राज्यांनी पेट्रोल-डिझेलचा कर कमी करून दिलासा दिला. पण राज्याची अर्थव्यवस्था चांगली असूनही पेट्रोल-डिझेलचा कर कमी करण्यासाठी फुटकी कवडी दिली नाही. आता सायकल मोर्चा काढणार नाना पटोले आणि काँग्रेस आता कोणता मोर्चा काढणार आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तसेच मराठवाडा आणि विदर्भासाठी काही दिलं नाही. मराठवाडा ग्रीडचा खून या सरकारने केला. कुठल्याच घटकाला काही दिलं नाही. उत्तर महाराष्ट्र हे बजेटमध्ये दिसत नाही. ते नकाशावर आहे, याचा विसर पडला आहे. केंद्र सरकारच्या योजना मात्र जोरात घोषित करण्यात आल्यात, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.