मुंबईः एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यालाच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेत नाहीत. अजान स्पर्धा भरवणार ते, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार ते, वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व गोष्टी करणार ते आणि अशा प्रकारे ज्या वेळेस त्यांचेच घटकपक्ष हे एमआयएमसोबत जाण्याचा विचार करतायत. त्यावेळेस आरोपही करणार तेच, ही सगळी मिलीजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळताहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. पुण्यात ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
मी ठरवलं की नंबर 1 येतोच, मात्र महाविकास आघाडीचे नेते तीन मार्कशीट जुळवून पहिले आले, असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय. बैलगाडा शर्यतीवर बंदी आणणाऱ्यांनी मावळात येऊन पाहावे. आपलं सरकार आलं आणि तेव्हा आम्ही प्रयत्न करत बैलगाडा शर्यत सुरू केली. मात्र ही मंडळी पुन्हा कोर्टात गेली आणि बंदी आणली. मी त्यावेळी एक समिती निर्माण केली आणि बैल हा धावणारा प्राणी आहे म्हणून कागदपत्रे कोर्टात देत ही बंदी उठवली, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.
ही त्यांची मिलीजुली कुस्ती आहे,
ते सगळे मिळून खेळताहेत !
पुण्यात माध्यमांशी संवाद… #Pune pic.twitter.com/KWJqaxnr0h— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 20, 2022
शिवसेनेचे विचार गावागावात पोहोचवणे गरजेचे
भाजपचं हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपलं हिंदुत्व हे देशाच्या हिताचं आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्यामुळे याकडे दुर्लक्ष करू. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका आणि त्यांचा डाव हाणून पाडा, असं ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. राज्यात एकामागोमाग एक घटना घडत असून या सर्वांना आपण तोंड देत आहोत. मला एका जागी बसावं लागत आहे. परंतु पुढच्या काही दिवसांमध्ये मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल. तुमची साथ आहे. त्यामुळे एका ठिकाणी बसून राज्याचे काम पुढे नेत आहे. शिवसेनेचे विचार गावा गावात पोहोचवणे गरजेचे आहे. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय.
हेही वाचा : महाराष्ट्र पिंजून काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, हिंदुत्वाच्या मुद्दयावरून भाजपला घेरलं