संभाजीनगर – अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. आर्थिक संकटात सापडल्याने पंडित एकनाथ निकम (४७) या शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.
हेही वाचा – दगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच 50 आमदार फुटले का?, केसरकरांचा ठाकरेंना प्रतिप्रश्न
कन्नड तालुक्यातील नादरपूर येथील पंडित निकम यांची नादरपूर शिवारात गट नंबर १२१ मध्ये शेती आहे. निकम यांनी उधारीवर बियाणे आणून मका आणि कापूस पिकाची लागवड केली. जून-जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिके जोमात आली होती. त्यामुळे या कापसाला चांगला भाव मिळून कर्ज फिटेसल या आशेवर पंडित निकम होते. मात्र, परतीच्या पावसात अतिवृष्टी झाल्याने या शेतकऱ्याला अतोनात नुकसान झाले. कापूस पाण्याखाली गेला तर, मकाला कोंब फुटली. त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.
कर्जावर घेतलेले पैसे कसे परत करावे या विवंचनेत असल्याने रविवारी शेताच्या कामासाठी जायला निघालेल्या पंडित निकम यांनी आत्महत्या केली. लिंबाच्या झाडाला दोरी बांधून त्यांनी आपले जीवन संपवले. सायंकाळी डोंगरातून बकऱ्या चारून घरी परतणाऱ्या गुराख्यालास निकम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी तातडीने गावात माहिती दिल्यानंतर नातेवाईक, गावकरी घटनास्थळी धावले. निकम यांना तातडीने पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांची धुसफूस चव्हाट्यावर, गुवाहाटीवरून पेटला वाद
अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतपिके पाण्याखाली गेली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने शेतकरी विवंचनेत आहेत. अशातच, राजकीय नेते दौरे करत आहेत. मोठमोठ्या योजनांची खैरात करत आहेत. प्रत्यक्षात मात्र, शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा आणि निधीचा काहीच लाभ होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना राबवण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.