घरताज्या घडामोडीदहावी - बारावीची परीक्षा जूनमध्ये ऑफलाईन पद्धतीने? पुढील आठवड्यात महत्वाचा निर्णय

दहावी – बारावीची परीक्षा जूनमध्ये ऑफलाईन पद्धतीने? पुढील आठवड्यात महत्वाचा निर्णय

Subscribe

राज्यात कोरोनाचे वाढलेले थैमान पाहता, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत नेमका काय निर्णय होणार ? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांनाही पडलेला आहे. पण कोरोना हाताळण्यात महाराष्ट्रात हाताबाहेर चाललेली परिस्थिती पाहता राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या बाबतीत शिक्षण विभागाकडून विद्यार्थी आणि पालकांना एक मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेत आमदारांसोबत झालेल्या बैठकीत दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा कोरोनाच्या संकटाच्या कालावधीत न घेता ही परीक्षा जूनमध्ये घेण्याचे ठरल्याचे कळते. परंतु याबाबतची अधिकृत माहिती ही येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येणार असल्याचे कळते. राज्यातील अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण पाहता ही परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी करण्यात येत होती. तर ऑनलाईन परीक्षा घ्या, अशी मागणी करणारीही काही पालक विद्यार्थ्यांची मागणी आहे. पण सध्या राज्यात कोरोनाची भयंकर झालेली परिस्थिती पाहता राज्यात या दोन्ही परीक्षा जूनमध्ये जेव्हा कोरोनाचा प्रभाव कमी होईल, त्यावेळी परीक्षा घेण्याबाबतची चर्चा आजच्या बैठकीत झाली. खुद्द शिक्षणमंत्र्यांनीही विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणार असून येत्या चार ते पाच दिवसात याबाबतचा निर्णय होईल, असे स्पष्ट केले.

राज्यात काही ठिकाणी कोरोनाची परिस्थिती पाहता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमार्फतही दहावी आणि बारावी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केली आहे. भाजपचे आशिष शेलार यांनीही दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलत वेगवेगळ्या मोडमध्ये ही परीक्षा घ्यावी अशी मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मागणी केली की, राज्यातील परीक्षेपूर्वी प्रक्रियेतील सर्वांच लसीकरण करावे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणीही मागणी त्यांनी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी समाजातील सर्व घटकांनी सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत रोहित पवार यांनी मांडले. वर्षा गायकवाड यांनी यांनी राज्यातील आमदारांशी संवाद साधला. त्यावेळी रोहित पवार यांनीही आपले परीक्षांबाबतचे मत मांडले.

- Advertisement -

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत स्पष्ट केले की, कोरोनाच्या परिस्थितीमुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अनेक विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळेच शिक्षणमंत्र्यांना मीदेखील विनंती केली आहे की विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे असणार आहे. करिअर महत्वाचे आहेच, पण त्यासोबतच आरोग्यही महत्वाचे असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितल्याचे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता येत्या दिवसांमध्ये आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ची पूर्वपरीक्षाही रद्द करण्यात आली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडून परीक्षा रद्द करण्यासाठीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे करण्यात आली होती. त्यामुळे मनसेकडून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या संवादानंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. एमपीएससीची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्यानेच, राज्यात येत्या दिवसांमध्ये असलेली परीक्षा घेऊ नये अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती.

- Advertisement -

दहावीच्या परीक्षेला साधारणपणे १७ लाख तर बारावीच्या परीक्षेला १५ लाख विद्यार्थी बसतात. यंदा दहावीची परीक्षा येत्या २९ एप्रिल ते २० मे दरम्यान आहे. तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत आहे. त्यामुळे एकत्रित अशा ३२ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे शिवधनुष्य हे शिक्षण विभागाला पेलायचे आहे. तुलनेत एमपीएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही तुलनेने कमी आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत येणारे पालक, परीक्षेच्या ठिकाणी असणारा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग पाहता मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निमित्ताने असणार आहे. त्यामुळेच शिक्षण विभागाकडून येत्या दिवसामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात येईल.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -