कल्याणमध्ये गंधारी पुलावर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. कल्पेश जाधव असं या मृत तरुणाचे नाव असून तो कल्याणजवळील एका गावातील रहिवासी आहे. गंधारी पुलावरील खड्ड्यात बाईक आदळून कल्पेश खाली पडला त्यानंतर मागून आलेल्या ट्रकखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. कल्याणमधील खड्ड्यांमुळे बळी गेलेल्याचा आकडा पाचवर पोहचला आहे.
खड्ड्यांमुळे तरुणाचा मृत्यू
कल्याणमधील रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसापासून अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याणमधील नागरिकांनी यासंदर्भात संताप व्यक्त करत प्रशासनावर टीका केली आहे. आज सकाळी गांधारी पुलावरुन प्रवास करणाऱ्या एका तरुणाचा खड्ड्यांमुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. खड्ड्यामध्ये बाईक आदळून खाली पडलेल्या कल्पेश जाधव या तरुणाला मागून आलेल्या ट्रकने चिरडले. या अपघातामध्ये कल्पेशचा जागीच मृत्यू झाला. कल्पेशचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.
खड्ड्यांमुळे महिन्यात ५ जणांचा मृत्यू
पहिला अपघात –
७ जुलैला शिवाजी चौकात खड्ड्यांमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मनीषा भोईर आपल्या नवऱ्यासोबत बाईकवरुन जात होत्या. खड्ड्यांमुळे त्यांची बाईक घसरुन अपघात झाला. यामध्ये मनिषा यांचा मृत्यू झाला.
दुसरा अपघात –
१० जुलैला भिवंडी- कल्याण बायपास रोडवर अपघात झाला. खड्ड्यांमुळे ट्रक शेजारुन जाणाऱ्या रिक्षावर जाऊन आदळला. या अपघातामध्ये रिक्षामधील ४ प्रवासी जखमी झाले तर २ जणांचा मृत्यू झाला.
तिसरा अपघात –
११ जुलैला कल्याणच्या हाजी मलंग रोडवरील द्वारली गावाच्या रस्त्यावर अपघात झाला. खड्ड्यात पाय गेल्याने एक वयोवृध्द व्यक्ती रस्त्यावर पडली. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
चौथा अपघात –
१३ जुलैला सकाळी गंधारी पुलावर खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातामध्ये कल्पेश जाधवचा मृत्यू झाला. बाईक खड्ड्यामध्ये आदळून कल्पेश खाली पडला आणि मागून आलेल्या ट्रकने त्याला चिरडले यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.