माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी आपल्या सरन्यायाधीश म्हणून कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर निकाल दिला आहे. वादग्रस्त प्रकरणांवरही माजी न्या. शरद बोबडे यांनी मोठे निर्णय दिले आहेत. शरद बोबडे यांचा कार्यकाळ संपुर्ण कोरोना परिस्थितीत गेला तरिही अनेक वादग्रस्त प्रकरणांमध्ये त्यांचे नाव नेहमी चर्चेत असायचे. माजी सरन्यायाधीश शरद बोबडे विधी पंडित पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राज्यपाल ऑनलाईनमाध्यमातून या सोहळ्याला उपस्थित राहिले होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज झालेल्या १०८ व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांना मानवविद्या शाखेतील ‘विधी पंडित’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या समारंभात न्या. शरद बोबडे यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव श्रीनिवास शरद बोबडे यांनी मानद पदवीचा स्वीकार केला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांचे दीक्षांत भाषण झाले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुभाष चौधरी, प्रकुलगुरू डॉ.संजय दुधे व कुलसचिव डॉ राजू हिवसे उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०८ व्या दीक्षांत समारंभात कुलपती @BSKoshyari यांच्या दूरस्थ उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांना मानवविद्या शाखेतील ‘विधी पंडित’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. pic.twitter.com/gvnDzHimN7
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 9, 2021
राज्यपालांच्या उपस्थितीत ७७ हजार ९१२ स्नातकांना पदवी व पदवी प्रमाणपत्रे तसेच सुवर्ण व रौप्य पदके प्रदान करण्यात आली. दोन उमेदवारांना मानव विज्ञान पंडित (डी.लिट.) ही पदवी तसेच 867 स्नातकांना आचार्य (पीएच.डी.) पदवी देण्यात आली.
२३ एप्रिल रोजी निवृत्त
माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी अयोध्या प्रकरण, नागरिकत्व सुधारणा कायदा, स्थलांतरीत मजूर,कृषी कायदे यांसह अनेक मुद्द्यावर निकाल दिले आहेत. भारताचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी शपथ घेतली होती. न्या. बोबडे २३ एप्रिल २०२१ रोजी निवृत्त झाले. कोविड काळात न्या. बोबडे यांनी उत्तम कामगिरी केली तसेच केंद्र सरकारला अनेक मुद्द्यावंर जाब देखील विचारला होता. न्या.शरद बोबडे यांच्यानंतर सरन्यायाधीशपदाची सूत्र न्या. एन व्ही रमणा यांच्याकडे देण्यात आली आहेत.