देशातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे दर चढेच राहिल्यामुळे महानगरांमध्ये कांद्याचे प्रतिकिलो दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे केंद्र सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात देशात १ लाख मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एमएमटीसी कंपनीला कांदा आयातीचे निर्देश दिले असून, त्या कांंद्याच्या वितरणाची जबाबदारी नाफेडवर सोपवली आहे.
ऑगस्टअखेरपासून कांद्याच्या दरात वाढ झाल्याने केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने ५ सप्टेंबरला दोन हजार टन कांदा आयातीचा निर्णय घेतला होता. तरीही कांद्याचे दर वाढतच आहेत. सध्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील खरिप कांद्याचे मोठे नुकसान झाले. तसेच, फारच थोडा उन्हाळ कांदा शेतकर्यांकडे शिल्लक आहे. यामुळे कांद्याची भिस्त कर्नाटक, आंध्रप्रदेश, राजस्थान व गुजरातमधील उत्पादनावर अवलंबून असल्याने कांद्याचे घाऊक दर क्विंटलला साडेचार हजारांदरम्यान आहेत. यामुळे महानगरांमध्ये कांदा १०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आयातीचा निर्णय घेतल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली.