नाशिकरोड : भारतीय रेल्वेने नवरात्रोत्सवानिमित्त रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी टोल फ्री नंबरवर कॉल करुन उपवासाचे पदार्थ मागविण्याची विशेष सुविधा जाहीर केली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
देशभरात दुर्गा पूजा व नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्त लाखो भाविक दर्शन व उत्साहात सहभागी होण्यासाठी रेल्वेने प्रवास करत असतात. नवरात्रीचा उपवास असणार्या भाविक प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भारतीय रेल्वेने आयआरसीटीसीने खास योजना आणली आहे. प्रवाशांना फराळाची थाळी उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी १३२३ क्रमांकावर कॉल करुन पसंतीचे फराळ मागविता येईल. उत्तर भारतीयांत प्रसिद्ध खास कूटूपासून बनविलेले पदार्थ रेल्वेने उपलब्ध करुन दिले आहेत.
असा असेल मेन्यू
- फळ, उपवासाची भजी व दही ९९ रुपये
- दोन पराठे, बटाट्याची भाजी, साबूदाण्याची खीर ९९ रुपये
- चार पराठे, तीन भाज्या, साबूदाण्याची खिचडी १९९ रुपये
- पनीर पराठा, उपवास मसाला, बटाटे पराठे आणि सिंगाडा २५० रुपये
ही सुविधा केवळ मोजक्याच गाड्यांपुरता मर्यादित न ठेवता देशातील प्रत्येक रेल्वे गाडीत ही सुविधा उपलब्ध करुन दिली पाहिजे. भाविकांसाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे. : सुभाषचंद्र गुप्ता, रेल यात्री परिषद