लॉकडाऊन काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली नव्हती. मात्र, जसा देश अनलॉक करण्यात आला तसं पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. मे महिन्याच्या अखेरीस शहरामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर सुमारे ७६ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर दर ६५ रुपयांच्या जवळपास होता. परंतु गेल्या १९ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र मात्र कायम आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे नागरिक आदल्या रात्रीच पेट्रोल पंपावर रांग लावत आहेत. पेट्रोल पंपावरच्या गर्दीवरुन अभिनेता अक्षय कुमारने ट्विट केलं होतं. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अक्षय कुमारला सवाल करत टोला लगावला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून अभिनेता अक्षय कुमारने १६ मे २०११ रोजी एक ट्विट केलं होतं. “मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती,” असं ट्विट अक्षय कुमारने केलं होतं. यावरू आता आव्हाडांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. “तू ट्विटरवर अॅक्टिव्ह आहेस का? तू गाड्या वापरणं बंद केलं आहेस का? तू वृत्तपत्र वाचत नाहीस का? तुझ्या माहितीसाठी, पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे,” असं आव्हाड म्हणाले.
R u not active on @Twitter …
Have u stopped using cars..
Dnt u read news paper….@akshaykumar ….
There has been a steep #PetrolDieselPriceHike just for Ur information https://t.co/f5Dr1UPFhs— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 25, 2020
दरम्यान, गुरूवारी पेट्रोलियम कंपन्यांनी सलग एकोणीसाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली. यानंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८६.७० रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ७८.३४ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरारवर कच्च्या तेलाची किंमत कमी असली तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत घट होऊन ते ४० डॉलर्स प्रति बॅरलच्या जवळपास आहे. गेल्या १९ दिवसांमध्ये डिझेलच्या दरात १०.६२ रूपये आणि पेट्रोलच्या दरात ८.६६ रूपयांची वाढ झाली आहे.
हेही वाचा – आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती, १२ जणांचा मृत्यू