गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारीकडे डोळे लावून बसलेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यावर्षी कार्तिकी यात्रेला जिल्हाधिकारी प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. कोरोना संबंधी नियम आणि अटींचे पालन करून १५ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांना यंदा पंढरपूरच्या वारीला जाता येणार आहे. शनिवारी संध्याकाळी विठ्ठल मंदिरातील देवाचा पलंग काढल्यानं रविवारपासून देवाच्या २४ तास दर्शनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दर्शनाला हजारो भाविक दाखल झाले आहेत.
दिंड्यांमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी ६५ एकर परिसरात उतरवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यासाठी चंद्रभागा वाळवंटामध्ये १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये मंडप टाकून कीर्तन, प्रवचन कार्यक्रमांना परवानगी असेल. मात्र कार्तिकी यात्रेदरम्यान मंदिरामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलींचे कडक पालन झाले पाहिजे तसेच कार्तिकी एकादशी दिवशीच्या रथोत्सवालाही गर्दी न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.
या यात्रेच्या काळात म्हणजे २४ नोव्हेंबरपर्यंत विठ्ठल मंदिर भविकांना दर्शनासाठी २४ तास खुले राहणार आहे. यामुळे यात्राकाळात दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे.
यात्रेसाठी उपस्थिती प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी याशिवाय मंदिरात शासकीय महापूजेच्या वेळी हजर राहणाऱ्या सर्वांची RTPCR चाचण्या होणार असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. वारकऱ्यांचे निवासस्थळ असणाऱ्या ६५ एकर परिसराची सफाई पूर्ण झाली असून येथील ३५० प्लॉटचे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. मात्र शासनानं कार्तिकीबाबत कोणतीही घोषणा केली नसली तरी प्रशासनाकडून कार्तिकी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा कार्तिकी सोहळ्याला लाखो वारकऱ्यांना जात येणार असल्याने ही वारकरी संप्रदायाला प्रशासनाकडून मिळालेली खास दिवाळी भेट ठरली आहे.