शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली. राज्यातील राजकीय घडामोडीनंतर संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, शिवसेना- संभाजी ब्रिगेड युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. यावर शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले केदार दिघे?
मेहबुबा मुफ्ती बरोबर सत्तेसाठी युती करणारी भाजप शिवसेनेला हिंदुत्व शिकवत आहे. भाजपने आधी स्वतःच्या भूमिका तपासून पहाव्यात आणि मग इतरांना सल्ले द्यावेत. पक्ष फोडून विचार चोरता येत नाही. महाराष्ट्र आणि तमाम सर्वसामान्य हिंदूंचे हित जपण्यासाठी शिवसेना सक्षम आहे, असं ट्विट करत केदार दिघेंनी फडणवीसांवर टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीसांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला राजीनामा दिल्याच्या निर्णयावर फडणवीस म्हणाले की, काँग्रेसची स्थिती ही बुडत्या नावेसारखी झाली आहे. अनेक लोक काँग्रेस सोडत आहेत. त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. मी त्यावर जास्त बोलणार नाही असंही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : सेना- संभाजी ब्रिगेड युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांचा हल्लाबोल