नाशिकः नाशिक येथे गोदाकाठी होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याची तयारी सुरु झाली आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कुंभमेळ्यासाठी भरघोस निधी जाईल. निधीची कमतरता पडू दिली जाणर नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली.
नाशिकच्या पंचवटी येथील श्रीराम सार्वजनिक वाचनालय परिसरात हभप त्र्यंबकराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसिय वारकरी संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री कराड यांनी ही माहिती दिली. पुढे ते म्हणाले, केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये वारकरी भवनासाठी जागा सुचवा. प्रस्ताव द्या. सीएसआरमधून निधी देतो, असे आश्वासनही मंत्री कराड यांनी दिले.
या संमेलनात वारकऱ्यांचे अनेक प्रस्तावही मंजूर करण्यात आले. नाशिकमध्ये वारकरी भवन व्हावे, संतपीठाची उपशाखा त्र्यंबक, नाशिकला व्हावी. संत वाङमय स्वस्तात मिळावे, कीर्तनकार, प्रवचनकार व कथाकार यांनी वारकरी आचारसंहिता पाळून विधाने, निरुपणे करावीत. तीर्थक्षेत्र परिसर व्यसनमुक्त करावा, या परिसरातील पशुहत्या थांबवावी. ब्रह्मगिरीचे उत्खनन थांबवावे, निसर्गाचे संरक्षण करावे. संत निवृत्तीनाथ पालखी मार्गाला राज्य मान्यता मिळावी, संत निवृत्तीनाथ पालखीचा प्रसार व प्रचार व्यापक प्रमाणात करावा, असे ठराव संमेलनात मांडण्यात आले.
यावेळी मंत्री कराड यांंनी राम मंदिर उभारणीची आठवण करुन दिली. ते म्हणाले, अयोद्धेत राम मंदिर व्हावे ही अनेक पिढ्यांची ईच्छा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे राम मंदिराची उभारणी होत आहे. पुढच्या वर्षी राम मंदिराचे काम पूर्ण होईल. यासोबतच काशी तीर्थक्षेत्राचा विकास सुरु आहे. त्यामुळे नाशिक येथील वारकरी भवनासाठीही प्रयत्न केले जातील. वारकरी भवनासाठी निधी देण्याकरिता मुख्यंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. नक्कीच नाशिकमध्ये वारकरी भवन होईल. कारण वारकरी संप्रदायाला मानणारे सरकार सध्या सत्तेत आहे.
पुढे ते म्हणाले, नाशिक येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आहे. या समाधीसाठी प्रसाद योजनेतून १५ कोटी दिले गेले आहेत.अजून निधी लागला तर तोही दिला जाईल.