रत्नागिरी : महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेबाबतचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. ज्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची या लोकसभेतून अद्यापही अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. पण याबाबत आता नारायण राणे यांचे पुत्र, माजी खासदार निलेश राणे यांनी सूचक वक्तव्य केलेले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा सुटला का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. फॉर्म भरायची वेळ जवळ आली आहे. आज किंवा उद्या उमेदवारी जाहीर होईल, असे निलेश राणे यांच्याकडून सांगण्यात आल्याने याबाबत आता विविध चर्चांना उधाण आले आहे. (Lok Sabha Election 2024 Nilesh Rane indicative statement regarding Ratnagiri-Sindhudurg Constituency)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेतून महायुतीकडून भाजपातर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार, असे जवळपास निश्चित झाले आहे. पण याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कारण याच जागेवर शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांच्याकडूनही दावा करण्यात आला आहे. पण याबाबत बोलताना आता माजी खासदार निलेश राणे म्हणाले की, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात अडचण नाही. दोन-तीन ठिकाणी अडचणीचे काही विषय असतील. पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कुठलीही अडचण नाही.
हेही वाचा… Ajit Pawar : द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? मुलींच्या जन्मदराबाबत अजित पवाराचं वादग्रस्त विधान
तसेच, महायुती आहे, पण मी सुद्धा लढावे असे वाटू शकते. दोन-तीन जागा वाढवून मिळाव्यात असे वाटते. त्यामुळे वेळ लागला असेल, मी त्या प्रक्रियेत नाही. परंतु, आमचं सगळ ठरल आहे. सगळे घटक पक्ष एक होऊन महायुतीच्या प्रचाराला लागले आहेत. प्रत्येकाला असे वाटते की, आपण ही सीट लढवावी. सध्या वातावरण पोषक आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. 100 टक्के महायुती जिंकणार, त्या बद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही, असा दावाच यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
तसेच, यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. आम्ही विनायक राऊत यांना प्रतिस्पर्धी मानत नाही. फॉर्म भरताना शक्ती प्रदर्शन करायची एक पद्धत असते. कालच्या सभेत 1200-1300 लोक होते. राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव गट मिळून 1200-1300 लोकच होते. रत्नागिरी सारख्या ठिकाणी इतके कमी लोक. विनायक राऊत यांच्यापासून कुठलाही धोका नाही. आता जनतेपर्यंत पोहोचायचे आहे. त्यांची काम करुन द्यायची. मागच्या 10 वर्षाचा बॅकलॉग भरुन काढायचा. हेच व्हिजन ठेऊन काम करणार आहोत. महायुती म्हणून आम्ही एक आहोत, उमेदवारी कोणालाही मिळो, आम्ही एक होऊन लढू, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
Edited By : Poonam Khadtale