पुणे : भाजपसाठी सोलापूर जिंकणं थोड कठीण आहे. पण माढा जिंकणं जास्त कठीण आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. ‘कश्मीर ते कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे. त्यांना षडयंत्र केल्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता. पण चंद्रकांतदादा पाटील खरं बोलले याबद्दल त्यांचे आभार मानते’, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजप आमदार चंद्रकांत पाटलांवर टीका केली. (Lok Sabha Election 2024 Supriya Sule Slams Chandrakant Patil in pune)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. “काश्मीर ते कन्याकुमारी ज्यांची सत्ता आहे. त्यांना षडयंत्र केल्याशिवाय दुसरा काही मार्गच नव्हता. पण चंद्रकांतदादा पाटील खरं बोलले याबद्दल त्यांचे आभार मानते. सातत्याने चंद्रकांदादा एकच गोष्ट म्हणत असतात की, आम्हाला शरद पवारांना संपवायचे आहे. त्यामुळे ही लढाई केवळ एका विचाराला आणि देशात अभिमान असणाऱ्या नेत्याकडे ज्या विश्वासाने पाहिले जाते असे नाव म्हणजे शरद पवार. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मागील अनेक वर्ष हे नाव राहिलेले आहे. त्यामुळे शरद पवार आणि महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र आहे. त्यामुळे सातत्याने चंद्रकांत पाटील बोलतात एक पण आता त्यांच्या मनातील गोष्ट समोर आली आहे”, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली.
नेमकं काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
चंद्रकांत पाटील हे काल (17 मार्च) सोलापूर मतदारसंघात होते. त्यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा शहरात चंद्रकांत पाटील यांनी आमदार समाधान अवताडे आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्यासह कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी मंगळवेढ्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर आणि माढ्याबाबत विधान केले. “भाजपसाठी सोलापूर जिंकणं थोड कठीण आहे. पण माढा जिंकणं जास्त कठीण आहे”, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते.
Edited By – Vaibhav Patil