दहावी, बारावीचा निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशातच बोर्डाच्या निकालाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच या बोर्डाच्या निकालासंदर्भात पुढील आठवड्यात एक बैठक घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. अहमदनगरमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात वर्षा गायकवाड बोलत होत्या.
यावेळी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दहावी आणि बारावीचा निकाल वेळेवर लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मार्चमध्ये एक बैठक झाली, पुढच्या आठवड्यातही एक बैठक होईल, साधारण: पंधरा दिवसाच्या अंतराने दहावी आणि बारालीचा निकाल लागतात यंदाही हे निकाल वेळेत लागणार आहेत.
राज्यातील भोंग्याच्या राजकारणावरून शाळा परिसरातील भोंग्याबाबत काय निर्णय घेणार यावर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, अलीकडेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी केली. बाबासाहेबांनी शांतीचा संदेश दिला, देशात एकोपा आणि एकसंघ ठेण्यासाठी प्रयत्न करायला हवे म्हणत यावर सविस्तर बोलणे टाळले.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, 10 जूनपूर्वी दहावीचा आणि 15 जूनपूर्वी बारावीचा निकाल लागणे अपेक्षित आहे. मात्र औरंगाबाद मंडळाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि नियमनाचे कामकाज पाहता निकाल उशीरा लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. तर विनाअनुदानित/स्वयं अर्थसहाय्यीत तत्वावरील शाळांचे शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात वेळ घालवत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर बोर्डाने संबंधित शाळेचे मंडळ मान्यता काढून घेण्यात येईल आणि बोर्डाचा सांकेतिक क्रमांकही गोठवण्यात येईल,असा इशारा दिला आहे. त्यामुळे यंदा दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लावण्याची शक्यता आहे.