बंगळुरू : भाजप आणि त्यांच्या सहकार्यांकडून देशात सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केला. हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर दिल्लीतील कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात ठेवणे ही केंद्र सरकारचीच जबाबदारी आहे, असे सांगतानाच देशात शांततेचे वातावरण कसे राहील, लोकांमध्ये समभाव कसा टिकून राहील, यासाठी जनजागृती करण्याचे आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्नाटकातील बंगळुरू शहरात एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला उपस्थित शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ज्याप्रमाणे देशात सांप्रदायिकता वाढणे हा चिंतेचा विषय आहे, त्याचप्रमाणे पेट्रोल-डिझेल, घरगुती सिलिंडरच्या किमती वाढणे, महागाई वाढणे हादेखील देशातील सर्वसामान्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. या प्रश्नावर जनमत तयार करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. भाजपविरोधी पक्षांची बैठक घ्यावी, अशीही अनेकांची इच्छा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे काही जणांचे मत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांशी बोलून आम्ही निर्णय घेऊ. बैठक घेण्याचे अजून आम्ही ठरवलेले नाही, असेही शरद पवार यांनी सांगितले.
तसेच विरोधकांची मोट बांधण्यासाठी बैठक घ्यावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आम्हाला लेखी कळवले आहे. त्यांची अपेक्षा अशी आहे की, याचा पुढाकार मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे आणि मी घ्यावा.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) April 18, 2022
आम्ही देशपातळीवर पक्षाची बांधणी करत आहोत. ज्या राज्यात पक्षाची शक्ती कमी आहे अशा राज्यांपैकी कर्नाटक एक राज्य आहे. इथे थोडे जास्त लक्ष देण्यास आजपासून सुरुवात केली आहे. तसेच विरोधकांची मोट बांधण्यासाठी बैठक घ्यावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आम्हाला लेखी कळवले आहे. त्यांची अपेक्षा अशी आहे की, याचा पुढाकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मी घ्यावा. आम्ही इतर नेत्यांशी बोलून अंतिम निर्णय घेऊ. मात्र याची कोणतीही तारीख ठरलेली नाही, असंही शरद पवार म्हणालेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना एखाद्याला धोका असेल तर त्याला सुरक्षा पुरवण्यात आमची हरकत नाही. तो केंद्राचा विषय असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.