महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांच्या संख्येत चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होत आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट वाढताना दिसत आहे. बुधवारी २९ हजार २७० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ५४,६०,५८९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.५४ टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी हा रिकव्हरी रेट ९४.२८ टक्के इतका होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नसला तरी रिकव्हरी रेट वाढताना दिसत आहे. तसेच बुधवारी राज्यात १५ हजार १६९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.
अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
बुधवारी राज्यात १५ हजार १६९ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५७ लाख ७६ हजार १८४ वर पोहोचली आहे. तसेच अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मंगळवारी २ लाख ३० हजार ६८१ अॅक्टिव्ह रुग्ण होते, तर बुधवारी हा आकडा खाली घसरून २ लाख १६ हजार १६ इतका झाला. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,५५,१४,५९४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,७६,१८४ (१६.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,८७,६४३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ७,४१८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
२८५ कोरोनाबाधितांचा मृत्यू
बुधवारी मृतांच्या संख्येतही घट झालेली पाहायला मिळाली. मंगळवारी ४७७ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला होता, तर बुधवारी २८५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर १.६७ टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत ९६ हजार ७५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.