राज्यात कोरोनाची परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसत आहे. राज्यातील सक्रिय रुग्ण संख्येत आज मोठी घट झाली आहे. काल ३ लाख १ हजार ४१ सक्रिय रुग्णांची संख्या होती. आज राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाखांवर आली आहे. तसेच राज्यातील कोरोनातून रिकव्हरी होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मागील २४ तासांत राज्यात २० हजार ७४० नवे कोरोनाबाधित आढळले असून ४२४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाख ९२ हजार ९२०वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ९३ हजार १९८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ८९ हजार ८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज दिवसभरात ३१ हजार ६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ५३ लाख ७ हजार ८७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.२४% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६४% एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ४२४ मृत्यूंपैकी २९१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वी झालेले विविध जिल्हे आणि मनपा क्षेत्रातील मृत्यू कोविड पोर्टलवर आज अद्ययावत झाल्याने त्यांचा समावेश आज राज्याच्या एकूण मृत्यूमध्ये करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील एकूण मृत्यूची संख्या ५४९ ने वाढली आहे. हे ५४९ मृत्यू, पुणे- ९६, औरंगाबाद- ५४, सातारा- ५३, सोलापूर- ४२, भंडारा- ३९, अहमदनगर- ३५, वर्धा- ३२, रत्नागिरी- २८, लातूर- २३, यवतमाळ- १८, उस्मानाबाद- १४, पालघर- १४, नाशिक- १३, नांदेड- १२, सांगली- ११, कोल्हापूर- १०, रायगड- १०, ठाणे- १०, वाशिम- ९, नागपूर- ८, जळगाव- ४, बुलढाणा- ३, नंदूरबार- ३, चंद्रपूर- २, परभणी- २, सिंधुदुर्ग- २, अकोला- १ आणि अमरावती- १ असे आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ४३ लाख ५० हजार १८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख ९२ हजार ९२० (१६.५७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २१ लाख ५४ हजार ९७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १६ हजार ७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: राज्यातील लॉकडाऊन १५ दिवस वाढवला; १ जूनला नियमावली जाहीर होणार – राजेश टोपे