गेल्या जवळपास दीड वर्षांपासून राज्यासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या ओसरत आहे. यातच राज्यासाठी आज एक दिलासाजनक बातमी समोर आली आहे. आज इतक्या महिन्यानंतर पहिल्यांदाच राज्यात एक हजाराहून खाली कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वात दिलासाजनक बाब म्हणजे १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही तर १२ जिल्ह्यांमध्ये एकेरी संख्येत नवीन कोरोना रुग्ण नोंदविण्यात आले आहे. यात मुंबई, ठाणे, पुणे आणि रत्नागिरी वगळता कोणत्याही जिल्ह्यात मृत्यूची नोंद झालेली नाही.
सोमवारी (२६ ऑक्टोबर) राज्यात गेल्या २४ तासांत ८९९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातील रुग्णसंख्येनंतरची ही सर्वात मोठी घट आहे. तर आज राज्यात कोरोनामुळे १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मृत्यूचे प्रमाण २.१२ टक्के इतके कमी झाले आहे. तर एकूण १५८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रूग्णांचा रिकवरी रेट सध्या ९७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
आरोग्य विभागाच्या आकडेनुसार, सध्या राज्यात १ लाख ८३ लाख ०९२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि ९५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांचे प्रमाण १ टक्क्य़ांवर पोहचले आहे.
महाराष्ट्र कोरोना विषाणूचे सर्वात प्रभावित राज्य आहे. मात्र रुग्णसंख्या कमी होत असल्याचे १८ ऑक्टोबरपासून लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले. तर दुकानं, हॉटेल यांना वेळ वाढवून देण्यात आला आहे. तर राज्यातील धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालय टप्प्याटप्प्याने सुरु होत आहेत.