राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जलदगतीने पसरत आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. गेल्या २४ तासात राज्यात ६३ हजार २९४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात आज ३४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.७ टक्के एवढा आहे. मागील २४ तासात ३४,००८ रुग्णांनी कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण २७ लाख ८२ हजार १६१ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.६५ एवढे झाले आहे. आजपर्यंत तपाण्यात आलेल्या २ कोटी २१ लाख १४ हजार ३७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४ लाख ०७ हजार २४५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३१,७५,५८५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २५ हजार ६९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५ लाख ६५ हजार ५८७ आहेत. आज राज्यात ६३,२९४ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ३४,०७,२४५ झाली आहे.
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ही १२ हजार १७ वर गेली आहे. या ५८ मृतांमध्ये ४२ रुग्ण पुरुष तर १६ महिला रुग्ण आहेत. तसेच, ५८ पैकी ४३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. गेल्या २४ तासांत मुंबई शहर व उपनगरे परिसरात ९ हजार ९८९ एवढे रुग्ण हे कोरोना बाधित असल्याचे नोंद झाली आहे.
राज्यात कडक लॉकडाऊनची शक्यता
राज्यात मोठ्या संख्येत कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्यात कडक लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्सची बैठक घेतली या बैठकीत राज्यात लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी यावरही चर्चा झाली. रेमडीसीव्हीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले.