मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ही १२ हजार १७ वर गेली आहे. या ५८ मृतांमध्ये ४२ रुग्ण पुरुष तर १६ महिला रुग्ण आहेत. तसेच, ५८ पैकी ४३ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. गेल्या २४ तासांत मुंबई शहर व उपनगरे परिसरात ९ हजार ९८९ एवढे रुग्ण हे कोरोना बाधित असल्याचे नोंद झाली आहे.
मुंबईत त्याचप्रमाणे, मृत ५८ रुग्णांपैकी ४३ रुग्ण हे ६० वर्षांवरील आहेत. तर , १४ रुग्ण हे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. मात्र एक रुग्ण ४० वर्षाखालील होता. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ५ लाख २० हजार २१४ एवढी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ हजार ५५४ इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनावर मात करणार्या रुग्णांची संख्या ४ लाख १४ हजार ६४१ एवढी आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ५२ हजार १५९ एवढया चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आजपर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या ४६ लाख १० हजार ७८९ एवढी आहे.
COVID19 | 9,989 new positive cases and 58 deaths reported in #Mumbai today pic.twitter.com/q106E2hGwy
— ANI (@ANI) April 11, 2021
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारद्वारा कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. परंतु वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय येत्या काही दिवसांत घेतला जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससमवेत बैठक
कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
आजच्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी यावरही चर्चा झाली. रेमडीसीव्हीरचा अति व अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले.