गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने राज्यात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यातील विविध भागात आज सकाळपासूनचं पावसाने दमदार सुरुवात केली आहे. मुंबईसह कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे. दरम्यान महाराष्ट्रात आजपासून पुढील चार दिवस मुळळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने महाराष्ट्रात विविध ठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. दरम्यान शनिवारी मुंबईच्या काही भागात पावसाचा जोर पाहायला मिळाली. तर मुंबईतील विविध ठिकाणी शनिवारपासूनचं पावसाची रिपरिप सुरु होती. यात पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची बरसात होणार आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. सध्या राज्यातील काही भागात चांगला पाऊस कोसळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर, नांदेड यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी याठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. तर यवतमाळसह काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पुरसदृष्ट स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी घरांच पाणी शिरल्याच्या घटना समोर आल्या.
कोकणात पावसाची दमदार बॅटिंग
तळकोकणातही पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. सिंधुदुर्गात संततधार पाऊस सुरु आहे. यामुळे पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहे. यात मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील निर्मला नदीला पूर आला आहे. यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे. यात रायगड, रत्नागिरीतही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीची काम वेगाने सुरु आहेत.
विदर्भात अतिवृष्टीचा इशारा
दरम्यान कोकणासह विदर्भातही यंदा पावसाने चांगली सुरुवात केली आहे. यात 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान विदर्भात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 10 ऑगस्टला काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे विदर्भात अनेक ठिकाणी पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.