घरमहाराष्ट्रमहावितरणची थकबाकी 73 हजार कोटींवर, अखंड वीजपुरवठ्यासाठी बिले भरण्याचे आवाहन

महावितरणची थकबाकी 73 हजार कोटींवर, अखंड वीजपुरवठ्यासाठी बिले भरण्याचे आवाहन

Subscribe

मुंबई : मुंबई उपनगरसह राज्याच्या बहुतांश भागात वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीची ग्राहकांकडील वीज थकबाकी आता 73 हजार 361 कोटी रुपयांवर पोहचली आहे. ही प्रचंड थकबाकी वसूल करण्याचे आव्हान महावितरण समोर असल्याने कंपनीचे अध्यक्ष तथा व्यस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले आहे.

महावितरणचा एकूण उत्पन्नाच्या सुमारे 80 टक्के रक्कम ही वीजखरेदीवर खर्च होत असल्याने अखंड वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी वीजबिलांचे उत्पन्न हा एकमेव उपाय आहे. त्यामुळे घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषीग्राहक अशा सर्व ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असेही सिंघल म्हणाले. महावितरण ग्राहकांना केवळ वापरलेल्या विजेचे पैसे बिलाच्या स्वरुपात आकारते. जी सेवा वापरली आहे त्याचे बिल देण्यास कोणी विरोध करेल, अशी शक्यता नाही. काही ग्राहक मोबाईल, डीटीएच, केबलचे बिल अशी बिले नियमित भरत असताना त्यांच्यासाठी अत्यावश्यक सुविधा असलेल्या विजेचे बिल भरण्यास टाळाटाळ करतात हे आश्चर्यकारक आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

महावितरणसुद्धा एक ग्राहक असून इतरांकडून वीजखरेदी करून ग्राहकांना पुरवते. महावितरण स्वतः वीजनिर्मिती करत नाही किंवा कंपनीला कोणाकडून मोफत वीज मिळत नाही. 2021-22 या गेल्या आर्थिक वर्षात महावितरणने वीजखरेदीपोटी 69 हजार 478 कोटी रुपये खर्च केले होते, याकडे सिंघल यांनी लक्ष वेधले.

महावितरणला ग्राहकांकडून मिळणारे वीजबिलाचे पैसे हाच उत्पन्नाचा एकमेव मार्ग आहे. बिलाच्या उत्पन्नातून कंपनी वीजखरेदीचे पैसे देते आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे वेतन, वीज प्रकल्पांचा खर्च भागवला जातो. वीजबिलांतून उत्पन्न मिळणे म्हणजे महावितरणचा श्वास चालू राहण्यासारखे आहे. अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी महावितरणकडे ग्राहकांनी वीजबिले भरणे हा एकमेव पर्याय आहे, असेही सिंघल म्हणाले.

- Advertisement -

वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. पाणीपुरवठा, रुग्णालयांचे काम, इमारतीतील लिफ्ट, वाहतूक नियंत्रण, कार्यालयांचे कामकाज, बँकिंग अशा अनेक सेवा या वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यासाठी अखंड वीजपुरवठा करायचा तर महावितरणला वीजखरेदी करण्यासाठी पैसे उभे करणे आवश्यक आहे. महावितरणकडे बिलांच्या माध्यमातून पैसे आले तरच कंपनीला वीजखरेदी करणे आणि ती ग्राहकांना पुरविणे शक्य आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीजबिले भरण्यास प्राधान्य द्यावे आणि वेळेत वीजबिले भरावीत, असे आवाहन सिंघल यांनी केले आहे.

15 शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत बील भरलेच नाही
महावितरणकडून शेतकऱ्यांना खूप मोठ्या सवलतीच्या दरात वीजपुरवठा होतो. तरीही राज्यातील 15 लाख 19 हजार कृषीग्राहकांनी गेली पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकही बिल भरलेले नाही आणि त्यांच्याकडे 21 हजार 67 कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी 3 लाख 23 हजार असे कृषीपंपधारक ग्राहक आहेत, ज्यांनी पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ एकही वीजबिल भरलेले नाही आणि त्यांच्याकडे 5 हजार 216 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती सिंघल यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -