बीड – शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे रात्रीच बीडवरून मुंबईकडे निघाले होते. शनिवारी त्यांना मंत्रालयातून 2 वेळा फोन आले होते. सुरुवातीला रविवारी दुपारी 4 वाजता बैठक ठरली होती. त्यानंतर सायंकाळी सात वाजता त्यांना फोन करून तातडीने मुंबईला या, बैठक 12 वाजता होणार आहे, असे सांगण्यात आल्याचा गौप्यस्फोट मराठा आंदोलनाचे नेते दिलीप पाटील यांनी केला आहे.
विनायक मेटे यांनी दोन्ही फोन आले तेव्हा मी बीडमध्य आहे. एवढ्या तातडीने मुंबईला कसा पोहोचेन असे त्यांना फोनवर कळविले होते. मात्र, त्यांच्यावर मुंबईला तातडीने याण्यासाठी दबाव कोणी टाकला, याची चौकशी झाली पाहिजे असे पाटील म्हणाले. दरम्यान दुपारी 4 वाजता बैठक ठरली होती. वेळ बदलली नसती तर मेटे सकाळी निघून दुपारपर्यंत मुंबईला पोहोचले असते. दुपारी 12 ची वेळ ठेवल्याने मेटे रात्रीच मुंबईला जाण्यासाठी निघाले. ही वेळ कोणी बदलली असा सवाल त्यांनी केला आहे.
शिवसेनेची चौकशीची मागणी –
याचबरोबर शिवसेनेने देखील मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आहे. शिंदे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले होते, तेव्हा मेटे यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मेटे यांना कोणी फोन करून बोलावले, याची चौकशी व्हावी अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे.