सोलापूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिलेला 40 दिवसांचा कालावधी उद्या (ता. 24 ऑक्टोबर) संपत आहे. पण अद्यापही त्या संदर्भातील कोणत्याही हालचाली सरकारकडून होत नसल्याचे पाहायला मिळत आहे. आधी मनोज जरांगे पाटील आणि त्यानंतर आज मराठा क्रांती मोर्चाकडून आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला इशारा दिला आहे. पण त्याआधीच मराठा समाज आक्रमक झाला आहे. सोलापुरातील माढ्यात आज (ता. 23 ऑक्टोबर) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. यावेळी भर सभेत त्यांना मराठा आंदोलकाकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. ज्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली. (Maratha protestors showed black flags to Ajit Pawar)
हेही वाचा – “आरक्षण हवे तर ‘ओबीसी’मधूनच…”, मराठा मोर्चाने मांडली स्पष्ट भूमिका
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना गाळप हंगाम कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात अजित पवारांनी भाषण केले. याचवेळी भाषण सुरू असताना एका मराठा आंदोलकाने काळे झेंडे दाखवले. यानंतर पोलिसांनी लगेच काळे झेंडे दाखवणाऱ्या मराठा आंदोलकाला ताब्यात घेतले. परंतु, हा कार्यक्रम होण्याआधीच मराठा आंदोलकांनी अजित पवार यांना या कार्यक्रमाला येण्यास विरोध केला होता. यावेळी मराठा आंदोलकांचा राज्य सरकारविषयी रोष दिसून आला.
अजित पवार हे माढा येथील बबनदादा शिंदे यांच्या पिंपळनेर साखर कारखान्यावर कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. परंतु, सकल मराठा समाजाने त्यांना येऊ देणार नाही असा इशारा दिला होता. माढा पोलिसांना त्यांच्याकडून तसा अर्ज देखील देण्यात आला होता. पण पोलिसांना अर्ज देऊन सुद्धा सभा झाल्याने मराठा समाज आक्रमक झाला. ज्यानंतर मराठा समाजातील एका आंदोलकाकडून भर सभेत काळे झेंडे दाखविण्यात आले.
या कार्यक्रमात अजित पवार मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आम्ही 16 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. आम्ही दिलेले आरक्षण हायकोर्टात टिकले नाही, मात्र फडणवीसांनी टिकणारे आरक्षण दिले होते. मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. आरक्षणासंदर्भात समिती नेमण्यात आली आहे. या प्रश्नावर सर्व राजकिय पक्षांसोबत बैठक घेतली आहे. मागणी करण्याचा अधिकार आहे. आधीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळाले पाहिजे, अशी सर्वांची इच्छा आहे. राज्यात जातनिहाय गणना झाली पाहिजे. जातनिहाय गणनेनंतर समाजासमोर चित्र स्पष्ट होईल. आम्ही सर्वांना आरक्षण देण्याच्या बाजूने असल्याचे अजित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे.