मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलन काढण्याची घोषणा केली. कोल्हापूरनंतर नाशिकमध्ये झालेल्या मूक आंदोलनानंतर संभाजीराजे यांनी राज्य सरकारला २१ दिवसांची मुदत दिली. यावरुन संभाजीराजे यांच्या भूमिकेवर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, रविवारी संभाजीराजे यांनी आरोप करणाऱ्यांना ‘माझ्यावर छत्रपतींचे संस्कार, मी मॅनेज होईल का?’ असा परखड सवाल केला. ते कोल्हापुरात मराठा संघटनांच्या समन्वयकांशी संवाद साधताना बोलत होते.
मोर्चा काढणाऱ्यांनाही दिला सल्ला
राज्य सरकार सोबत झालेल्या बैठकीतील चर्चेची माहिती त्यांनी आज कोल्हापुरात मराठा संघटनांच्या समन्वयकांना दिली. आंदोलने करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र जे लोक ठोक मोर्चाची भाषा करत आहेत त्यांनी आधी लक्षात घेतले पाहिजे की त्याचे काय परिणाम होतील. कोरोनाचे संकट आहे, कोल्हापूरकरांनी हे संकट आणखी वाढवलं हा ठपका आपल्यावर बसेल. आणि म्हणूनच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आम्ही निर्णय घेत आहोत. आंदोलन करताना, मोर्चा काढताना जरा आजुबाजूला करोनाची काय स्थिती आहे, याचे भान ठेवा असा सल्लाही त्यांनी मराठा आरक्षणाप्रश्नी ठोक मोर्चा काढण्याचा इशारा दिलेल्या संघटनांना दिला आहे.
मागण्या संपूर्ण राज्यासाठी
माझ्या मागण्या संपूर्ण राज्यासाठी आहेत. सारथी संस्थेचं उपकेंद्र केवळ कोल्हापुरात नाही, तर आठ ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे शिव-शाहू यांचे विचार हे केवळ कोल्हापूर पुरते मर्यादित नाहीत, संपूर्ण देशभर आहेत, असं संभाजीराजे म्हणाले.