मुंबई – थंडीची चाहूल लागते न लागते तोच मुंबईतील गारवा काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा राज्यात थंडी परतण्याचे संकेत हवामान विभागाने (Maharashtra Weather Update) दिले आहेत. काही दिवसंपासून तपमानात घट झाली आहे. सध्या विदर्भात थंडी कायम असून फेब्रुवारी महिन्यातही राज्यात थंडी कायम राहणार आहे.
राज्यातून काढता पाय घेतलेली थंडी आता पुन्हा एकदा परतण्याच्या मार्गावर आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये गारठा जाणवू लागला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळं येत्या काही दिवसांमध्ये राज्यात पाऊस आणि थंडी असं दुहेरी चित्र पाहायला मिळू शकतं. तसेच किमान तापमानात तीन अंशांची घटही नोंदवली जाऊ शकते.
हेही वाचा – Ajit Pawar Interview : नेतृत्वाबद्दल विश्वास हवा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा रोख कुणाकडे?
हवामान विभागाकडूनही फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. काही दिवस आधीच राज्यात पडलेल्या थंडीमुळे त्याची चिन्हं दिसू लागली आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पुणे आणि मुंबईतील तपमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या विदर्भात थंडी कायम असून फेब्रुवारी महिन्यातही राज्यात थंडी कायम राहणार आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढणार आहे. तर फेब्रुवारी महिन्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहणार असल्याचे पुणे वेध शाळेने म्हटले आहे.
हेही वाचा – Maratha Reservation : दगाफटका झाला तर मंडल आयोगाला आव्हान; जरांगेंचा इशारा
उत्तरेतील थंडीचा परिणाम
उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे. राजधानी दिल्लीत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या जम्मू काश्मीरमध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे उत्तरकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी, राज्यात फेब्रुवारी महिन्यातही थंडीचा कडका वाढणार अशी शक्यता आहे. सध्या नाशिक, पुणे, मुंबई, जळगाव, नागपूर, अमरावती, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात थंडी जाणवते आहे.