राज्यभरात सध्या थंडीचा मोसम सुरु असताना अवकाळी पाऊस डोकेवर काढणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण मुंबई, कोकण वगळता राज्यातील इतर भागात पुढील काही दिवस ढगाळ वातावरणाचा सामना करावा लागणार आहे. कारण मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने येत्या ४८ तासाच पुणे, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खान्देश या भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
राज्यात मोठ्याप्रमाणात ऋतुचक्र बदत आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसातही पावसाचे ढग तयार होत आहेत. त्यामुळे राज्यातील काही भागात 18 फेब्रुवारी रोजी आकाश सामन्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार 16 ते 18 फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे.
पुणे शहरात १६ फेब्रुवारीपासून ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थंडीच्या मोसमावर याचा परिणाम होऊन थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. पुण्याच्या किमान तापमानात वाढ होऊन १४ अंश सेल्सियसवरुन १६ अंश सेल्सियसपर्यंत वाढू शकते. परंतु अवकाळी पावसातून मुंबई कोकणाला फारचा परिणाम जाणवणार नाही अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या अवकाळी पावसाचा फटका पूर्व-विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील पूर्व भागांना बसणार आहे. त्यामुळे या भागात 16 फेब्रुवारीला वादळी पावसाचा अंदाज आहे. तर 17 तारखेला विदर्भासह, मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्राचा विचार केला असता 18 फेब्रुवारीला खान्देश, नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे. याचदरम्यान गारपिटीचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागू शकतो अशी शक्यता ही वर्तवण्यात आली आहे. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 तारखेला काही प्रमाणात आभाळी हवामान राहील. यानंतर मात्र हवामान हळूहळू पूर्वपदावर येऊन त्यात स्थिरता यायला सुरुवात होईल आणि 20 तारखेपासून राज्यातील हवामान पूर्णपणे स्थिर होईल असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा- दहावी, बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, ‘हे’ आहेत बदल