नवी मुंबईच्या आयुक्तपदावरुन हटवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्यावर सोपविली. परंतु ज्या पद्धतीने नवी मुंबईत काम केले अगदी त्याच पद्धतीने त्यांनी नाशिकमध्येदेखील काम केले. परंतु तरिही तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपचे स्थानिक नेते व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. पंरतु या सर्व गोष्टींवर नाशिक महापालिका आयुक्त नाराज असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या तुकाराम मुंढे यांनी याबाबत ट्विटरवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पालिकेच्या कामात पारदर्शकता आणली, लोकांची आणि शहराची गरज ओळखून विविध प्रकल्प आणले. नागरी सेवा सुधारल्या, त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला. तरीदेखील माझ्याविरोधात अविश्वास ठराव का? असा सवात मुंढे यांनी ट्विटरवर केलेल्या ट्विटमध्ये उपस्थित केला आहे.
शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी प्रयत्न
प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या शिवसेनेचा या ठरावाला पाठिंबा मिळावा यासाठी भाजप लोकप्रतिनिधींनी सेनेच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. मुंढेंची कार्यपद्धती नाशिकमधील भाजपच्या नेत्यांना रुचलेली दिसत नाही. त्यामुळे भाजपने विरोधकांशी युती करून नवी मुंबईप्रमाणे मुंढे यांना नाशिकमधून हटवण्याचा प्रयत्न होत आहे.
अविश्वास ठरावासाठी स्वाक्षरी मोहीम
शहरातल्या करवाढीवरुन तुकाराम मुंढेंविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांशी संपर्क करत स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. स्थायी समितीच्या अनेक सदस्यांनी या पत्रावर स्वाक्षरी केलेली आहे. तसेच नगरसेवकांच्या घरोघरी जाऊन स्वाक्षरी घेतली जात आहे.
As NMC commissioner, brought transparency, efficiency,took up need based projects,improved civic services & use of IT has transformed governance. People have Reposed TRUST in Good governance based on transparency,public interests,sensitivity & efficiency. Why no confidence ??? pic.twitter.com/PFNYP1c71H
— Tukaram Mundhe (@Tukaram_Indias) August 26, 2018
नक्की कारण काय?
तुकाराम मुंढे यांनी नाशिकच्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून पालिकेतील वादग्रस्त प्रकरणे बाहेर पडू लागली आहेत. त्यामुळे भविष्यात अडचणी निर्णाण होऊ नये म्हणून मुंढेंविरोधात सर्व पक्ष एकत्र झाले आहेत. स्वाक्षरी मोहिम आटोपल्यानंतर हे पत्र घेऊन सर्वसाधारण सभा बोलाविली जाणार आहे.
काय केले मुंढे यांनी
तुकाराम मुंढे यांनी सात महिन्यांपूर्वी नाशिक महापालिकेचा कार्यभार हातात घेतला. त्यानंतर महापालिकेत सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी कठोर शिस्त लावली. पारदर्शकतेला प्राधान्य देऊन महापालिकेच्या कारभारात आमुलाग्र सुधारणा केली. रस्त्यांची २५० कोटींची कामे रद्द केली. नाशिक शहर बस सेवेसाठी त्यांनी आणलेली पद्धत नगसेवकांच्या पचनी पडली नाही. मुंढे यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या ताब्यातील पालिकेच्या मिळकती ताब्यात घेण्याची प्रक्रिया, पालिका संकुलातील गाळ्यांची भाडेवाढ, विकास कामांसाठी त्रिसुत्री, नगरसेवकांना प्रत्येकी ७५ लाखाचा स्वेच्छा निधी देण्यास नकार असे विविध कठोर निर्णय तुकाराम मुंढे यांनी घेतले. त्यामुळे नाशिक महापालिकेतले सर्व नगरसेवक मुंढे यांच्याविरोधात भ़़डकले असून ही सर्व मंडळी मुंढेंमुळे अस्वस्थ आहेत. त्यामुळे या अस्वस्थ झालेल्या नगरसेवक व नेते अविश्वास ठराव आणण्याच्या प्रयत्नात आहेत.