सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुहूर्ताची घोषणा केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. चिपी विमानतळाच्या उदघाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलवणार का? असा प्रश्न नारायण राणे यांना करण्यात आला होता मात्र मुख्यमंत्री कशाला हवेत, त्या खात्याशी संबंदित केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. यामुळे नारायण राणे विरुद्ध शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी ७ ऑक्टोबरला चिपी विमातळ वाहतुकीसाठी खुलं होणार असल्याची घोषणा केली होती. परंतु नारायण राणेंनी ९ ऑक्टोबरची तारिख दिल्यामुळे आता काय नाट्य रंगतंय हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधत चिपी विमानतळाच्या उद्घटनाची तारिख जाहीर केली आहे. केंद्रिय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते ९ ऑक्टोबरला चिपी विमानतळाचे उद्घाटन करणार असल्याचे नारायण राणे यांनी म्हटलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना बोलवणार का? असा प्रश्न नारायण राणे यांना करण्यात आला. यावर नारायण राणे यांनी म्हटलं आहे की, मुख्यमंत्री कशाला हवेत? मुख्यमंत्र्यांना बोलवलं पाहिजे असं काही नाही. संबंधित मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना बोलवले आहे. यामुळे मुख्यमंत्री पाहिजेतच असं नाही. असे वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे पुन्हा शिवसेना- नारायण राणे आमने सामने येण्याची शक्यता आहे.
राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
शिवसेनेच्या पर्यटन मंत्र्यांकडे फिरण्यापलिकडे काहीही नाही. त्यांनी आतापर्यंत काहीही राबवले नाही. कोकणात शिवसेनेने काय आणलं सांगा, उद्योगधंदे आणले नाही. नुकसान भरपाई कोण देणार, राज्य सरकार देते, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं पैसे दिले का? नाही केले, सी वॉर्ड केला का? कोणता प्रकल्प ८ बंधारे प्रकल्प बंद आहे. रस्त्याची काम ब्रीजची कामं सर्व बंद आहे. शिवसेनेचे खासदार काहीही कामाचे नाहीत. कलेक्शन मास्टर आहेत. पत्र व्यवहाराने काहीही होत नाही. अनेक लोकं पत्र व्यवहार करतात, शिवसेनेचे लोकं दावा करत असतात असा घणाघात नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला आहे.
चिपी विमानतळाचा मुहूर्त ठरला
बहुप्रतिक्षित सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा अखेर मुहूर्त ठरला आहे. ९ ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता चिपी विमानतळावरील वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. या विमानतळावरुन मुंबई आणि इतर ठिकाणी प्रवास करता येणार आहे. केंद्रिय मंत्री नारायण राणे आणि केंद्रिय नागरि उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीमध्ये चिपी विमानतळाची वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे.
हेही वाचा : चिपी विमानतळाचे उद्घाटन ९ ऑक्टोबरला, नारायण राणेंची ‘कोकण’वासीयांसाठी मोठी घोषणा