मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून फोन आणि भेटीगाठी घेऊन आश्वस्त केले जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील राणेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी राणेंना फोन केल्याची माहिती दिली. या दोन्ही बड्या नेत्यांनी राणेंची विचारपूस केल्याचं जठार यांनी सांगितलं. तसंच पोलीस कारवाई आणि अटकेच्या कारवाईबाबतचे तपशीलही अमित शहा यांनी नारायण राणे यांना विचारल्याचे समजते. त्यामुळे आता भाजप नारायण राणे यांच्यावरील कारवाईचा वचपा काढण्यासाठी कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पक्ष म्हणून पाठीशी – फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंविरोधात केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राणे यांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील त्यांचीच री ओढली होती.
अमित शहांशी बोला, आठवलेंचा सल्ला
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी नारायण राणे यांची त्यांच्या जुहू येथील घरी भेट घेतली. यावेळी आठवले यांनी राणेंना दिल्लीत येऊन झालेल्या प्रकाराची गृहमंत्री अमित शहांना माहिती द्यावी, असा सल्ला दिला. दरम्यान, आठवले यांनी नारायण राणेंना रिपब्लिकन पक्षाचा जाहीर पाठिंबा दिला आहे. राणेंवर झालेली कारवाई ही अन्यायकारक आणि चुकीची असल्याचा आरोपही आठवले यांनी केला होता.