पक्षाचे जबबादार पदाधिकारी असताना दिनकर पाटील यांनी पक्षविरोधी भूमिका घेत सभागृहात आंदोलन केल्याने ही बाब निश्चितपणे पक्षाला पटलेली नाही. यामुळेच त्यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. दिनकर पाटील यांच्यावरील पुढील कारवाईबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. नाशिक येथे भाजप महिला मोर्चा राज्य कार्यकारीणी बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
महाजन म्हणाले, आम्ही नाशिककरांना विकासाचा शब्द दिला आहे. मंदिरप्रश्न हा कायद्याच्या कचाट्यातला प्रश्न आहे. आम्ही मंदिरे हटवण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत, असे असतानाही विनाकारण कोणत्याही विषयाचे भांडवल करून पक्षाला बदनाम करणे पक्षाला पटलेली नाही. दिनकर पाटील यांच्याकडे सभागृह नेतेपद असतानाही पक्षाच्या एका जबाबदार पदाधिकार्याने आंदोलन करणे योग्य नाही. पक्षामध्ये अशाप्रकारचे नाटक चालणार नाही. कारवाईबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोयनेतील पाणी वापटाबाबत ते म्हणाले, सध्या आपण ७ टीएमसी पाणी आपण घेतच आहोत. लवादाचा निर्णय होईपर्यंत आपणास पाणी घेता येणार नाही. याकरता आम्ही भांडतो आहोत. लवादाच्या निर्णयानंतर आपल्या हक्काचे २३ टीएमसी पाणी घेणारच आहोत. यावर्षी पाउस उशिरा सुरू झालेला आहे. तरी मराठवाडा काही भागात पावसाची सुरूवात आहे. पण अजूनही धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. काही भागात टँकरची संख्या कमी होत चालली आहे. पुढील दोन तीन दिवसांत चांगला पाऊस होईल आणि निश्चितपणे टंचाई दूर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत पोलीस आयुक्तांशी चर्चा करून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यांसर्दभात चर्चा केल्याचे ते म्हणाले.
शहराध्यक्ष बदल नियमित बाब
नाशिक शहर शहराध्यक्ष बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत ते म्हणाले, एक व्यक्ती एक पद हे पक्षाचे धोरणच आहे. विधानसभा निवडणुका लढवायच्या आहेत, त्यांना इतर जबाबदारी देऊ नये हा पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे नाशिकसाठी काहीतरी वेगळा निर्णय घेतला जातोय, असे अजिबात नाही. त्यामुळे याबाबत गैरसमज निर्माण करू नये, असेही त्यांनी सांगितले.