देवळा : काबाडकष्ट करून उभी केलेली द्राक्षबाग सध्या फळांनी लगडल्या असतानाच अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान आणि धुक्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. जिल्ह्यात सलग दुसर्यावर्षी अनेक द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने इतर अर्ली द्राक्ष उत्पादकांचे चार ते पाच कोटींचे नुकसान झाले आहे.
अर्ली द्राक्षपीक घेणार्या उत्पादकांचे गेल्यावर्षीदेखील अशाच प्रकारे निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान झाले होते. यंदा १० डिसेंबरपर्यंत वातावरण चांगले असल्याने यंदाचा हंगाम चांगला येईल, असा अंदाज होता. मात्र, ११ तारखेपासून अवकाळी पाऊस व दाट धुक्याचा द्राक्षबागांना फटका बसला. त्यामुळे यंदाचा हंगामदेखील वाया गेल्याचे विदारक चित्र आहे. देवळा तालुक्यातील वाजगाव परिसरात सलग तीन ते चार दिवसांपासून सुरु असलेल्या पाऊस व दाट धुक्याचा व सकाळी पडणार्या दवबिंदूंमुळे येथील बळीराम नथू देवरे यांचा ४० ते ५० टन उत्पादन अपेक्षित असणार्या द्राक्षबागेतील द्राक्षांच्या मण्यांना तडे जाऊन झाडावरच द्राक्षघड कुजायला लागले आहेत.
सलग दुसर्या वर्षी नुकसान
वाजगाव,खर्डा ,कनकापूर, भावडे, कापशी, विठेवाडी, भऊर, खामखेडा या परिसरातील शेतकरी दरवर्षी अर्ली द्राक्ष घेतात. गेल्यावर्षीदेखील या पट्ट्यात काढणीला आलेल्या द्राक्षांचे प्रचंड नुकसान झाले होते. यंदादेखील लांबलेल्या पावसाने व सुरुवातीपासूनच द्राक्ष उत्पादक शेतकर्यांनी प्रचंड मेहनतीने निर्यातक्षम द्राक्ष तयार केले होते. मागील चार-पाच दिवसांपासून परिसरात ढगाळ वातावरण, पावसाच्या हलक्या सरी, दाट धुके व दव असल्याने काढणीला आलेल्या द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान झाले. या परिसरातील अनेक शेतकर्यांच्या बागांमध्ये व्यापारी खरेदीसाठी फिरत होते. तर, अनेक शेतकर्यांचे बाग देऊन झाले असताना शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकर्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले आहे. एकट्या देवळा तालुक्यातील बळीराम देवरे, गोविंद देवरे, भूषण देवरे, प्रदीप देवरे, प्रमोद देवरे, अमोल देवरे, राजेंद्र देवरे, साहेबराव देवरे, गोटू देवरे, आबा सावकार, राहुल देवरे, महेश देवरे आदी शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.