जळगाव मतदारसंघात करण्यात आलेले सर्व्हेक्षण भाजप उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रतिकूल असल्यानेच उमेदवारी बदलाचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे वाघ यांच्याऐवजी ऐनवेळी उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याची भूमिका राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मांडली.
जळगाव मतदारसंघात भाजपने खासदार ए. टी.पाटील यांचा पत्ता कट करत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली; परंतु त्यांच्या उमेदवारीला पक्षातील अनेक नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे भाजपचा येथे पराभव होईल, अशी चर्चा होती. मात्र, एक एक जागा महत्वाची असल्याने पक्षाने वाघ यांचाही पत्ता कापून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी बहाल केली. याबाबत महाजन म्हणाले, स्मिता वाघ या पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यामुळेच त्यांना पक्षाने संधी दिली होती. मात्र, आलेले रिपोर्ट फारसे समाधानकारक नसल्याने पक्षाने तातडीने पुन्हा सर्वेक्षण करून घेतले. यातही अहवाल समाधानकारक नव्हता. त्यामुळे सर्वांशी चर्चा करून तातडीने उमेदवार बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला व उन्मेष पाटील यांना संधी दिली आहे. यात नाराज होण्याचा विषय नाही. पक्षाने स्मिता वाघ यांना बरीच संधी दिली आहे. आजही त्या विधान परिषदेत आमदार आहेत. त्यांचे पती उदय वाघ हे पाच वर्षांपासून जिल्हाध्यक्ष आहेत. यासह त्यांना राज्य पातळीवरही पदे दिली आहेत. त्यांचे कार्य पाहूनच पक्षाने वेळोवेळी संधी दिल्याचेही महाजन यावेळी म्हणाले.
तिकिट कापल्याने वाघ नाराज
पक्षाने आमच्यावर आधी विश्वास दाखवला. तिकिट कापायचेच होते तर द्यायलाच नको होते, आता तिकीट का कापण्यात आले? हे का आणि कसे घडले, याबाबत चौकशी करण्याची मागणी वरिष्ठांकडे करणार आहोत, अशी तीव्र प्रतिक्रिया जळगाव लोकसभा मतदार संघातून तिकीट कापण्यात आलेल्या भाजपच्या आमदार स्मिता वाघ व त्यांचे पती पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी व्यक्त केली.