एकलहरे : त्र्यंबकेश्वरला उगम पावणार्या गोदावरी नदीचं महात्म्य सर्वपरिचित आहे. म्हणूनच गोदावरीला अतिशय पवित्र मानलं जातं. मात्र, याच नदीची नाशिकमध्ये मात्र प्रचंड दूरवस्था झाल्याचं चित्र कायम आहे. नाशिक शहरात प्रदूषण नियंत्रणासाठी थोडेफार प्रयत्न होत असले तरीही, शहराच्या बाहेर पडताना गोदापात्रात प्रचंड फेस तयार झाला असल्याचं चित्र आहे. यावरुन महापालिकेचे प्रयत्न कसे फोल ठरताहेत हे दिसतंय.
शहरातलं विनाप्रक्रिया सांडपाणी थेट नदीपात्रात सोडलं जातं, याशिवाय एकलहरे वीजकेंद्रातलं ऑईलमिश्रीत पाणीही नदीपात्रात सोडलं जातं. त्यामुळे एकलहरे बंधार्यात या पाण्याला उग्र वास येत असून, पाण्यावर दररोज प्रचंड फेसाची निर्मिती होतेय. त्यामुळे महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभारावर स्थानिक ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय. गोदावरीत दिवसेंदिवस प्रदूषण वाढतच आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला वारंवार कळवूनही दखल घेतली जात नसल्याने हा विभाग झोपा काढतो की काय, अशा शब्दांत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
बर्फाचा भास
एकलहरे बंधार्यात पाण्याला उग्र दर्प येतो आणि याच ठिकाणी फेसामुळे संपूर्ण पात्रात बर्फ पडला की काय असा भास होतो. गेल्या काही वर्षांपासून हे दुर्दैवी चित्र कायम असतानाही संबंधित यंत्रणा मात्र गप्प आहेत.