नाशिकरोड । आठ वर्षापासून सातत्याने मनमानी करत असलेल्या जाखोरी गावच्या ग्रामसेवकाला संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडल्याची घटना शुक्रवारी (दि.१) सकाळी घडली. ग्रामसेवक उत्कर्ष पाटील हे एक महिन्यापासून रजेवर होते, त्यानंतर ते आज ग्रामपंचायत कार्यालयात हजर होताच ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट झाला. मनमानी पद्धतीने कारभार करत असलेल्या ग्रामसेवकाबद्दल अनेकदा तक्रारी करूनही जिल्हा परिषद त्याच्यावरील कारवाईकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला.
ग्रामसेवक गेल्या आठ वर्षापासून या गावात काम पाहत असून, त्यांच्याविषयी अनेक तक्रारी आहेत. हेतू पुरस्सर काम न करणे यावरुन ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप होता. ते मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे केल्यानंतरही बदली होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी ८ सप्टेबर २०२१ रोजी ग्रामसभेत ठराव करुन ग्रामसेवकाची तत्काळ बदली करण्याचा निर्णय घेत जिल्हा परिषदेला कळवला होता. ग्रामपंचायतीकडून इतक्या गंभीर तक्रारी करुनही जिल्हा परिषद अधिकारी त्यावर कोणताही निर्णय घेत नसल्याने शुक्रवारी सकाळी पाटील हे जाखोरी ग्रामपंचायत कार्यालयात रुजू झाल्यावर संतप्त सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी पाटील यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून देत बाहेरुन कुलूप लावले.