नाशिक :कोरोना ओसरल्याने तब्बल आठ महिन्यांनंतर महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक येथे व्यावसायिक नाटकाचा पडदा उघडला जाणार आहे. मराठी रंगभूमीवरील विक्रमादित्य नाटक पुन्हा सही रे सही या नाटकाने कालिदासाचा रंगमंच पुन्हा उजळणार आहे. शनिवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजता अभिनेता भारत जाधव यांच्या पुन्हा सही रे सही या नाटकाचा प्रयोग होणार आहे. कोरोना त्रिसुत्रींचे पालन करत नाटक बघण्याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कालिदास कलामंदिर बंद ठेवण्याची वेळ आले होती. शासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू केल्याने शिवाय करोनाच्या नियमावलीत पहिला बडगा नाट्यगृहावरच उगारला गेल्याने नाट्यगृह बंद होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत अवघी तीनच महिने कशीबशी नाट्यगृह सुरु होती. सध्या फक्त ५० टक्के आसन क्षमतेत हा प्रयोग होणार आहे. तिकीट दर न वाढवता होणार्या या प्रयोगाच्या तिकीट विक्रीचा शुभारंभ १० नोव्हेंबरपासून कालिदास कलामंदिर येथे होणार आहे. जोपर्यंत १०० टक्के आसन क्षमतेची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मुंबईबाहेरील प्रयोग हे आमच्यासाठी तोट्याचेच असतील. तरीही रंगभूमीपासून दुरावलेल्या रसिकांना पुन्हा थिएटरकडे आणण्यासाठी आणि एकूणच नाटकांवर अवलंबून असलेल्या लोकांसाठी हे प्रयोग करणे गरजेचे आहे, असे पुन्हा सही रे सही नाटकाचे निर्माते भरत जाधव यांनी सांगितले