नाशिक : नाशिकच्या मध्यवर्ती चौक असलेल्या रविवार कारंजा परिसरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. यावर तोडगा म्हणून दिवंगत नगरसेविका सुरेखाताई भोसले यांनी सहा वर्षांपूर्वी पाठपुरावा करून यशवंत मंडई ही इमारत तोडून त्याठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारावे अशी मागणी केली होती. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा देखील त्यांनी केला होता. आता याबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिन भोसले यांनी पालकमंत्री दादा भुसे यांना साकडे घालत यशवंत मंडई येथील पार्किंगचा प्रश्न शिंदे फडणवीस सरकारच्या कार्यकाळात मार्गी लागावा अशी अपेक्षा व्यक्त करत या वाहन तळासाठी नाशिक महानगरपालिकेच्या 2023 24 अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली आहे.
खरंतर शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेला रविवार कारंजा मेन रोड परिसरात होणारी वाहतूक कोंडी ही नित्यचित झालेली आहे. यासाठी सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे पार्किंगची व्यवस्था नसणे. यावरच तोडगा म्हणून दिवंगत नगरसेविका सुरेखा भोसले यांच्या संकल्पनेतून रविवार कारंजा परिसरात असलेल्या आणि मोडकळीस आलेल्या यशवंत मंडईच्या इमारतीच्या जागेवर जुनी इमारत पूर्णतः पाडून त्या ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारावे अशा स्वरूपाची मागणी करण्यात आली होती. नाशिक महानगरपालिकेत त्याबाबत ठराव देखील झाला होता. कालांतराने हा प्रकल्प स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून राबवला जाईल असा निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटी कंपनीने याबाबत वेळोवेळी निविदा काढल्या मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मागील सहा वर्षापासून हा प्रश्न प्रलंबितच आहे. यशवंत मंडईच्या जागेवर पार्किंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रकल्प प्रलंबित असल्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या तसेच पार्किंगची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.
आता याबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिन भोसले यांनी पुढाकार घेत थेट पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे साकडे घातले आहे नाशिक महानगरपालिकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात यशवंत मंडईच्या जागेवर पार्किंग कॉम्प्लेक्स सुधारण्यासाठी तरतूद करावी अशी मागणी केली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पार्किंगची व्यवस्था निर्माण झालीच तर अनेक प्रश्न सुटतील त्यासोबत शहराच्या सौंदर्यात देखील भर पडेल या हेतूने भोसले यांनी ही मागणी केली आहे. खरंतर नाशिक महानगरपालिकेने देखील याबाबत ठराव करत यशवंत पंढरीच्या जागेत पार्किंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र स्मार्ट सिटीने हा प्रकल्प करण्याचे ठरवले. त्यांनी त्याबाबत अनेकदा निविदा देखील काढल्या मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. काही महिन्यातच स्मार्ट सिटी चा कार्यकाळ देखील संपत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून हे काम होईल की नाही याबाबत शाश्वती नाही. म्हणून नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातूनच हा प्रकल्प उभारण्यात यावा आणि येथील स्थानिक नागरिक व्यापारी यांची वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्तता करावी अशी देखील मागणी समोर येत आहे.