पावसाच्या बहुप्रतिक्षेत असलेल्या व दोन महिन्यांपासून आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजावर अद्याप वरूनराजा मेहेरबान झालाच नाही. जायखेडासह परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. विहिरींना पाणी नाही. नदी, नाले, ओढे व बंधारे पावसाअभावी कोरडेठाक पडले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाच्या निसर्गाने चेहर्यावर नैराश्याची झालर पांघरल्याने, बळीराजा हताश झाला आहे.
चार-पाच वर्षांपासून सतत पडलेल्या दुष्काळाने बळीराजाची फारच दैनावस्था करून टाकल्याने बळीराजा हताश होऊन आर्थिक संकटात सापडला आहे. सततचा दुष्काळ, न होणारे उत्पादन, कुटुंबाची जबाबदारी या संपूर्ण त्रासाला बळीराजा मुकला होता. परंतु, यावर्षीही निसर्ग राजाने जायखेडासह परिसरातील गावांवर अवकृपा केली की काय, असा प्रश्न बळीराजाला भेडसावत आहे. विहिरींना पाणी नसल्याकारणाने पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. निसर्गाने साथ न दिल्याने व पेरणीयोग्य पाऊस न पडल्याने बळीराजाच्या चेहर्यावरचे हास्य कधीच गायब झाले आहे.
परिणामी, दमदार पाऊस न झाल्याने तलाव, बंधारे, ओढे, दगडी बांध, नाले कोरडेठाक पडले आहे. तर पावसाचे माहेरघर असलेल्या हरणबारी धरण परिसरात पाऊस नसल्यामुळे मोसम नदी नाराज झाली आहे. पावसाळ्यातही कडक उन्हाळा असल्याची जाणीव होत आहे. शेती व गावगाड्याचा पाणीप्रश्न मिटणार कि नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. जलयुक्त शिवार अबियानांतर्गत जायखेडा मोसम नदी परिसरात, नाल्यांवर बंधार्यांची निर्मिती करण्यासाठी आमदार, खासदार यांनी शासनाकडे पाठपुरावा कामे करून जलयुक्त शिवाराची कामे करणे गरजेचे होते. मात्र तसे दोनही लोकप्रतिनिधींकडून झाले नाही. पावसाळा सुरु होऊन दोन महिने संपत आली तरीही दमदार पाऊस पडत नसल्याने; हरणबारी धरणात शून्य टक्के पाणीसाठा असल्याने बळीराजाचे पुढील नियोजन अंधकारमय आहे हे स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर दिसत आहे.