विंचूर/लासलगाव:निसर्गाचा समतोल बिघडत असताना वृक्ष लागवड अत्यंत गरजेची बनली आहे. मात्र,अशा स्थितीत केवळ झाडे लावणेही महत्त्वाचे नाही. ते जगवणे आणि त्यांची योग्य वाढ करणे अधिक महत्त्वाचे ठरते. निफाड तालुक्यातील विंचूर येथे हिरवाईने नटलेल्या झाडांनी सजलेल्या सन्मित्र नीलेश चव्हाण उद्यानातून अगदी हाच संदेश दिला जात आहे.
या उद्यानातील १०० झाडांचा पाचवा वाढदिवस अनोख्या परंतु, प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला.
समाजात वावरताना आपण व्यक्तींचा, नेत्यांचा, प्राण्यांचा वाढदिवस साजरा करतानाची अनेक उदाहरणे पाहतो. मात्र, मोठ्या संख्येत वृक्ष लागवड करून त्याला खतपाणी घालून, त्याचे संगोपन करून पाच वर्षानंतर ते झाड डेरेदाखल झाल्यानंतर त्याचा वाढदिवस जोरदारपणे करण्याचे उदाहरण क्वचितच पाहायला मिळू शकते आणि तेच विंचूर येथील सन्मित्र नगरमधील रहिवाशांनी करून दाखवले आहे. विंचूर येथे डोंगरगांव रोडला सन्मित्र नगरमध्ये ‘सन्मित्र नीलेश चव्हाण उद्यानाची निर्मिती 20 गुंठे जागेत नीलेश चव्हाण मित्रमंडळ, हितचिंतक व ग्रामस्थांकडून लोकवर्गणीतून करण्यात आली आहे. यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेतली गेली नाही. शिवाजीर घायाळ, दिलिप कोथमिरे, अविनाश दुसाने, किशोर पाटील, एकनाथ बडाख, संतोष ऊशीर, योगेश खुळे, सुनील मोरे, रमेश ढवण, संजय झाल्टे, योगेश साळी, चांगदेव डोंगरे व अपर्णा प्राईड मंगल कार्यालयाचे कर्मचारी सदस्य प्रयत्नशील आहेत.