तामिळनाडूच्या विधानसभेत राज्यपालांच्या एका कृतीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. देशभरातील माध्यमांनी त्या घटनेची नोंद घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांनी विधानसभा अधिवेशनात कॅबिनेटने लिहून दिलेल्या भाषणातून थोर नेते रामास्वामी पेरियार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळला. यावेळी मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी तात्काळ हा मुद्दा उपस्थित करत राज्यपालांचा जाहीर निषेध केला. या घटनेनंतर राज्यपाल अधिवेशन सोडून निघून गेले. याच सर्व घटनेबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचं कौतुक केलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना आव्हाड म्हणाले की, तामिळनाडूच्या विधानसभेत राज्यपालांनी कॅबिनेटने लिहून दिलेल्या भाषणामधून काही गोष्टी गाळल्या. तामिळनाडूत ज्यांना देव मानल जातं. ज्यांना तेथील समाजसुधारणेचं सूत्रधार मानलं जातं, अशा पेरियार रामास्वामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणे राज्यपालांनी मुद्दामहून टाळलं. यानंतर मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जागच्या जागी राज्यपालांचा निषेध केला. याचा राग आल्याने राज्यपाल विधानसभेच्या अधिवेशन सोडून निघून गेले. पण मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यपालांना थांबवण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही, याचा मला अभिमान आहे, अस आव्हाड म्हणाले.
I salute chief minister of #TamilNadu #stalin when the governor changed the speech approved by the #cabinet and also dropped the name of #Periyar and #DrAmbedkar to which #CM #Stalin objected#JaiBhim pic.twitter.com/6EdzRcWime
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 10, 2023
आव्हाड पुढे म्हणाले की, “महापुरुषांचा अपमान सहन न करणं, ही भारताची परंपरा आहे, या परंपरेला एम के स्टॅलिन जागले. तामिळनाडूत पेरियार रामास्वामी यांना देवासमान मानलं जातं. त्या पेरियार रामास्वामींचा अपमान झाला… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला.. कॅबिनेटने लिहून दिलेल्या भाषणाचा निर्णय राज्यपालांनी स्वत: व्यासपीठावर गेल्यानंतर फिरवला. त्यावेळी मुख्यमंत्री स्टॅलिन ताठ मानेने उभे राहिले आणि राज्यपालांचा निषेध केला. यानंतर राज्यपाल अधिवेशनातून निघून गेले. पण स्टॅलिन यांनी राज्यपालांना अडवण्याचा एकदाही प्रयत्न केला नाही, त्यामुळे मुख्यमंत्री स्टॅलिन यांना माझा सलाम…,” अशा शब्दांत आव्हाडांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.