रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारिक गार्डन ही पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली होती. या इमारत दुर्घटनेतील मदत आणि बचावकार्य अखेर आज, बुधवारी दुपारी तब्बल ४० तासांनी पूर्ण झाले आहे. या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात ७ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे. तर इमारतीच्या ढिगाऱ्यातून ९ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये ५ पुरुष, ३ महिला आणि चार वर्षाच्या एका बालकाचा समावेश आहे. ही इमारत २४ ऑगस्टला संध्याकाळी सातच्या सुमारास कोसळली होती. यात २५ जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. यानंतर स्थानिक बचाव पथके आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांनी मदत तसेच बचावकार्य सुरु केले. सलग ४० तास हे मदत व बचावकार्य सुरु होते.
पुण्याहून एनडीआरएफची तीन पथके महाडला दाखल झाल्यानंतर मदत कार्याला आणखी गती मिळाली. या ठिकाणी ८ तव, १० जेसीबी, ४ पोखलेन तसेच १५ डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात आला. बचावकार्यात साळुंखे ग्रुप, महाबळेश्वर ट्रेकर्स ग्रुप, ठाणे डिझास्टर मॅनेजमेंट फार्स, कोल्हापूर रेस्क्यू टीम या संस्थांचा मोलाचा वाटा आहे.
मदत आणि पूनर्वसन मंत्री यांनी घटनास्थळी भेट दिली असून त्यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली. मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केली जाईल. यामध्ये चार लाख रुपयांची मदत आणि पुनर्वसन खात्यातर्फे तर १ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून देण्यात देण्यात येतील. जखमींना ५० हजार रुपयांची दिले जाणार आहे.