दीपक केसरकरांच्या मतदारसंघात काय अवस्था आहे हे मला चांगलं माहिती आहे. एकही नगरपालिका, नगरपंचायच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपचायत त्यांच्याकडे नाही. सगळ्या भाजपाकडे आहेत. शिंदेंमुळे केसरकरांना राजकीय कुबड्या मिळाल्या आहेत, असा पुन्हा घणाघात भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. (Nilesh Rane Attacks Deepak Kesarkar)
हेही वाचा – राणेंच्या मुलांना कोकणी माणसाने यापूर्वीच लायकी दाखवली; केसरकरांकडून निलेश राणेंना प्रत्युत्तर
निलेश राणे पुढे म्हणाले की, दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे भाजपाच्या लोकांविषयी बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. हल्ली आम्ही त्यांची दखलही घेत नाहीत. ते नव्यानेच माध्यमांसमोर बोलायला शिकलेत. पण कधीतरी भरकटतात ते.”
“हा माणूस उद्या काहीही बोलेल आणि आम्ही ते ऐकून घेणार एवढे काही दीपक केसरकर मोठे नाहीत. ते म्हणतात नारायण राणेंनी बोलण्याची शैली बदलावी. हे केसरकर आम्हाला बोलणार? ज्यांच्या मतदारसंघात २५ माणसंही त्यांना विचारत नाहीत, त्यांना आम्ही का विचारणार?” असंही निलेश राणे म्हणाले आहेत.
यावेळी निलेश राणे यांनी त्यांच्या प्रवक्तेपदाबाबातही टोला लगावला आहे. राणे म्हणाले की, “आता ते स्वत:ला विश्वप्रवक्ते समजायला लागले आहेत. उद्या तुम्ही त्यांना ब्रिटनच्या बोरीस जॉन्सन यांनी राजीनामा दिल्याबद्दल विचारलं, तर त्यावरही ते बोलतील. त्यांनी असं करायला नको होते, मी त्यांना समजावलं होतं वगैरे सांगतील. ते त्या भूमिकेत गेलेत. त्यामुळे ते काहीही बोलायला लागले आहेत.”
हेही वाचा – …मग काँग्रेसच्या प्रणव मुखर्जींना पाठिंबा का? निलेश राणे यांचा शिवसेनेला सवाल
“अडीच वर्षे आम्ही ठाकरेंवर टीका केली, तेव्हा केसरकर कुठे होते? आज त्यांना अचानक साक्षात्कार झालाय की उद्धव ठाकरे चांगले आहेत. उद्धव ठाकरे बनावट हिंदुत्व दाखवत होते म्हणून तुम्ही इकडे आलात ना? हिंदुत्वासाठी आलात ना. उद्धव ठाकरे पटत नव्हते म्हणून तुम्ही इकडे आलात. मग उद्धव ठाकरेंना अजूनही मानतो वगैरे हे ढोंग का करताय? त्यांना मानत होतात, तर मग सोडून का आलात?” असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.