पंढरपूर पोटनिवडणूक मतदानाचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे. पोटनिवडणूकींची रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. दिवंगत भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भगिरथ भालके हे भारत नाना भालकेंचे सुपुत्र आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते पंढरपूरमध्ये जाऊन आले आहेत तर आता राष्ट्रवादीचे नेते व खासदार अमोल कोल्हे यांनी कोरोनाच्या संकट काळात राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या आणि भगिरथ भालके यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन पंढरपूर करांना केले आहे.
राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या कोरोनाच्या संकटामध्ये राज्यातील जनतेच्या जीवाची पर्वा न करता राजकारण कोणी केले हे राज्याती जनता आणि पंढरपूर, मंगळवेढ्यानी पाहिले आहे. त्यामुळे पंढरपूर पोटनिवडूकीच्या निमित्ताने यांना जागा दाखवून देण्याची आता पंढरपूरकरांना सधी मिळाली आहे. भारत नानांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भगीरथ भालकेंच्या पाठीशी एकजूटीने उभा राहा असे आवाहन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून भगिरथ भालके निवडणूक लढवित आहेत. दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या अकाली निधनामुळे ही निवडणूक लागली आहे. भारतनानांवर या मतदारसंघातील जनतेने अलोट प्रेम केलं.@NCPspeaks pic.twitter.com/ylYQzj2qmu
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) April 15, 2021
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत म्हटले आहे की, भारतनानांवर या मतदारसंघातील जनतेने अलोट प्रेम केले आहे. भारतनाना येथील जनतेला आपल्या कुटुंबातील एक घटक मानत होते. त्यामुळे येथील मतदारही भालके कुटुंबीयांशी असणारा स्नेह जपत मतदार भगीरथ भालके यांना विजयी करतील असा विश्वास असल्याचे अमोल कोल्हेंनी म्हटले आहे.
पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजप उमेदवार सामाधान औताडे यांच्यात जोरदार संघर्ष सुरु आहे. निवडणूकीत आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही राजकीय पक्षांमध्ये चढाओढ दिसत आहे. महाविकास आघाडीतील पक्षांनी भगीरथ भालके यांना पाठिंबा दिला आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भगीरथ भालके यांना पाठिंबा दिल्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरली आहे. भगीरथ भालके यांना मोठा पाठिंबा असल्यामुळे त्यांचे पारडं जड झाले आहे. त्यामुळे आता भाजप उमेदवार समाधान औताडे यांच्यासमोर विजयी होण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे.