साकीनाका बलात्कार प्रकरणात राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक करण्यासाठीचा वेळ सरकारकडे नाही, असा आरोप विरोधक करत आहे. या प्रकरणातील पीडितेचा आज शनिवारी अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. आता या संपुर्ण प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) घेतली आहे. या संपुर्ण प्रकरणाची सुमोटो याचिका दाखल करत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संपुर्ण प्रकरणात सायंकाळपर्यंत जर काहीच घडामोड घडली नाही, तर मी मुंबईला या प्रकरणाच्या चौकशीसाठी सदस्य पाठवणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. तसेच बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटूंबीयांना मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राच्या डीजीपी यांना पत्र लिहित पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
Only 1 accused arrested (in Mumbai rape case). National Commission for Women (NCW) has taken suo moto. If there isn’t any development in matter until this evening, I’m going to send a member to inquire about it & also extend help to victim’s family: Rekha Sharma, NCW Chairperson pic.twitter.com/bLEORIJioz
— ANI (@ANI) September 11, 2021
पत्रात रेखा शर्मा यांनी लिहिले की, “पीडितेला ज्या क्रूरतेला आणि अत्याचाराला सामोरे जावे लागले त्याबद्दल आयोग निराश आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. या प्रकरणातील गुन्हा लक्षात घेत कायद्याच्या तरतुदींनुसार एफआयआर नोंदवावा.”
राष्ट्रीय महिला आयोगाने, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 357 (अ) अन्वये पीडितेच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. यासह पोलिसांनी या प्रकरणात केलेल्या कारवाईबद्दल आयोगाला लवकरात लवकर माहिती द्यावी अशी मागणी केली आहे.
विरोधकांक़डून संपात व्यक्त
राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यात महिला आयोगाला अध्यक्ष नाही अशी प्रतिक्रिया आज दिली होती. राज्य सरकारला अनेकदा महिला आयोगाच्या अध्यक्ष नेमणुकीबाबतचे आदेश दिले होते. तसेच राज्य सरकारनेही आयोगाला अध्यक्ष नेमण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारला इतकी फुरसत नाही की ते महिला आयोगाला अध्यक्ष देतील अशीही टीका फडणवीस यांनी केली आहे.
या संपुर्ण प्रकरणात फास्ट ट्रॅक खटला चालवणार – मुख्यमंत्री
या संपुर्ण घटनेत एका महिन्यात तपास पुर्ण करणार असल्याची माहिती मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. या संपुर्ण प्रकरणात एकच व्यक्ती असल्याचे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाल्याचेही ते म्हणाले. महिला ही बेशुद्ध अवस्थेत असल्यानेच या प्रकरणात महिलेचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या संपुर्ण प्रकरणात फास्ट ट्रॅक खटला चालवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.