घरमहाराष्ट्रफुलंब्रीतील तीन हजार मातांसाठी जीवनदायिनी ठरली ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’

फुलंब्रीतील तीन हजार मातांसाठी जीवनदायिनी ठरली ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’

Subscribe

तीन हजार मातांनी घेतला फायदा

देशभरात २०१७ पासून ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’ला सुरुवात झाली आहे. ही योजना सुरु झाल्यापासून राज्यातील फुलंब्री तालुक्यात आत्तापर्यंत तीन हजार ११३ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. गरोदर महिलांसह बाळाच्या पोषणासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी लाभार्थी महिलांना एक कोटी ३५ लाख ८ हजार रुपयांचे अनुदान आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील फुलंब्री तालुक्यातील सर्वाधिक तीन हजार मातांसाठी ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजना’ जीवनदायिनी ठरली आहे. या योजनेअंतर्गत गर्भावस्थेत महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनाकडून पाच हजार रुपये दिले जातात. त्यामुळे फुलंब्री तालुक्यातील बाळंतपणातील मृत्युदर कमी झालेले आहे. आरोग्य यंत्रणेनेचे आलिम शेख, तालुका कार्यक्रम सहाय्यक आणि राहुल मिसाळ, लेखापाल तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांनी ही योजना यशस्वी करण्यासाठी फुलंब्री तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न भाले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेतले आहेत.

पंतप्रधान मातृवंदना योजनेंतर्गत प्रथम प्रसव होणाऱ्या महिलांना पौष्टिक आहार मिळावा, मोलमजुरी करणाऱ्या महिलांना कामानिमित्त बाहेर जाताना आराम मिळावा, बाळाची निगा घेता यावी यासाठी तीन हप्त्यांमध्ये एकूण 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेकरिता केंद्राकडून 60 टक्‍के तर, राज्याकडून 40 टक्‍के निधी पुरविण्यात येतो. सुदृढ भारत या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून दारिद्र्यरेषेखालील व दारिद्ररेषेवरील गर्भवती महिला व माता कुपोषित राहू नये ,बालकाचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने मातृवंदना या योजनेला एक जानेवारी २०१७ रोजी मान्यता दिली. राज्यामध्ये २१ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान मातृवंदना योजना लागू करण्यास मान्यता देण्यात आली आणि ८ डिसेंबर २०१७ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

त्यामुळे फुलंब्री तालुक्यालाही या योजनेचा सर्वाधिक फायदा झाला आहे. फुलंब्रीमध्ये माता मृत्यू व बालमृत्यू कमी करण्यास ही योजना परिणामकारक ठरली आहे. राज्यात एक जानेवारी २०१७ रोजी अथवा त्यानंतर कुटुंबातील पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतात. ही योजना एकवेळ आर्थिक लाभाची असून, पहिल्या अपत्यापुरतीच मर्यादित आहे. तसेच या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत्यू बालक जन्मल्यास त्या टप्प्यापुरताच लाभ मिळतो. मातृवंदना योजनेत दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांचा समावेश असला, तरी वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. गर्भवतींना पाच हजार रुपये पंतप्रधान मातृवंदन योजनेअंतर्गत देण्यात येतात. हे पाच हजार रुपये तीन टप्प्यात देण्यात येतात. मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १०० दिवसात गरोदर महिलेची ऑनलाइन पद्धतीचा वापर करीत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये देण्यात येतात. दुसऱ्या टप्प्यात प्रसवपूर्व तपासणी केल्यावर गर्भधारणेच्या सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता २ हजार रुपये गर्भवतींना दिले जातात. प्रसुतीनंतर अपत्याची जन्म नोंदणी व बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी आणि हेपॅटायटिस बी व लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर अखेरच्या तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातात.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -