लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका हा वंचित बहुजन आघाडीमुळे बसला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव वंचित आघाडीमुळे झाला आहे. याशिवाय, इतर अनेक जागांवर राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला वंचित आघाडीमुळे मोठा फटका बसला आहे. देशाचे माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा देखील पराभव वंचित आघाडीमुळे झाला. त्यामुळे भविष्यात काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांशी हातमिळवणी केली तर काँग्रेसला फायदाच होणार आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सूचक असं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘कॉंग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली’, असं म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
काँग्रेसला यापुढे वंचित आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण काँग्रेससोबत राजकीय गुलामाची व्यवस्था संपली, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर काँग्रेसला सूचना दिली आहे.
काँग्रेसला या पुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण कॉंग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) 26 May 2019