नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरीच्या पूर पातळीत मोठी वाढ झालीय. पूर पातळीचा मापडंद मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आल्यानं, गोदापात्रालगतची दुकानं आणि परिसरातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी नेण्यात आलं.
आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरणातला जलसाठा ९८ टक्क्यांवर पोहोचल्याने जलसंपदा विभागाने गेल्या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने विसर्ग सुरू केलाय. त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. जलस्तर वाढल्यानं रामकुंड परिसरासह नदीपात्रातली काही मंदिरंही पाण्याखाली गेली. हवामान विभागानं शनिवारीच रविवारपासून मुसळधार पावसाचा अलर्ट दिला होता. संततधार पावसामुळे नदीकाठच्या लोकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, गोदावरीला आलेल्या पुरामुळे व्यावसायिकांनी नदीकाठची दुकानं सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केली.