घरमहाराष्ट्र‘अपना भी टाईम आएगा’, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया

‘अपना भी टाईम आएगा’, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया

Subscribe

9 दिवसाच्या सत्ता नाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने सरकार कोसळले. मात्र, यानंतर शिवसैनिकांचे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांचे ठाकरे यांना समर्थन मिळत आहे. सोबत मित्रपक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस यांनीही आपला पाठिंबा ठाकरे यांना असल्याचे सांगितले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अपना भी टाईम आएगा’ हा विश्वास करत त्यांनी उद्धव ठाकरेंना धीर दिला आहे. त्यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

रोहित पवारांची फेसबुक पोस्ट –
कोरोना, वादळे, महापूर यांसारख्या असंख्य संकटांवर मात करत मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकारने गेली अडीच वर्षे सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्राच्या परंपरेला साजेसा राज्यकारभार केला. सर्वसामान्यांना आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे भावणारे मुख्यमंत्री राजीनामा देत असताना महाराष्ट्र नक्कीच स्तब्ध झाल्याचे आपण सर्वांनी पाहिलंच असेल, असे रोहीत पवार म्हणाले.
उपलब्ध सर्व आर्थिक-राजकीय संसाधनांचा पद्धतशीरपणे वापर करणाऱ्या राज्यातील भाजपा नेतृत्वाला महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे श्रेय नक्कीच जाईल. कारण गेली अडीच वर्षे शक्य ते सर्व प्रयत्न करूनही यश येत नव्हते अशा स्थितीत सातत्याने सरकार पाडण्याचे प्रयत्न करत राहणे ही साधी सोपी गोष्ट नव्हती, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.
सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून राजकीय पटलावर वावरत असताना राजकारणाच्या बाबतीत माझा विचार काहीसा वेगळा होता. परंतु सध्याचे सत्तानाट्य बघितल्यानंतर मात्र राजकारणात बऱ्याच इतर गोष्टीही आवश्यक असतात, हे आज काही अंशी जाणवले. राजकीय रणनीती म्हणून बघताना भाजपच्या काही गोष्टी शाश्वत असल्या तरी सत्तेचा हा मार्ग पूर्णता शाश्वत होऊ शकत नाही, हेही तेवढंच सत्य आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सामान्य माणसात राहून सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम करणे हा मार्ग कठीण असला तरी सत्तेचा हाच शाश्वत मार्ग असू शकतो. त्यामुळे आज काहीसी निराशा असली तरी ‘अपना भी टाईम आएगा’ हाही विश्वास आहे.
सुरत – गुवाहाटी कुठल्या का मार्गाने होईना भाजपचे सरकार राज्यात स्थापन होतेय, याबद्दल त्यांना नक्कीच शुभेच्छा असतील. जीएसटीचे पैसे, ओबीसी–मराठा–धनगर आरक्षण असे अनेक विषय केंद्राशी संबंधित आहेत. केवळ महाविकास आघाडी सरकारला श्रेय मिळेल म्हणून या सरकारच्या काळात केंद्राने हे विषय सोडवण्यास सहाय्य केले नाही. परंतु राज्यात आता भाजपचे सरकार स्थापन होत असताना राज्याचे नेतृत्व नक्कीच हे सर्व विषय केंद्राकडून प्रामाणिकपणे सोडवून आणेल, ही आशा आहे.
मुखमंत्र्यानी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाने अजित दादा तसेच काँग्रेस नेत्यांच्या सोबतीने राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा, तत्वांचा वसा पुढे नेत विघातक वृत्तीच्या राजकारणापासून राज्याचे संरक्षण करत सामाजिक एकतेचा धागा मजबूत केला. येणारे सरकारही त्याच पावलांवर चालत महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती जपेल ही अपेक्षा आहे.
देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यासाठी सुरत–गुवाहाटीवरून केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा मार्ग काहींनी शोधला असला तरी हे सत्तानाट्य महाराष्ट्राच्या जनतेला नक्कीच पटलेले नसेल, असे ते म्हणाले.
सत्य आज कुठेतरी काही अंशी हरताना दिसत असले तरी शेवटी विजय मात्र सत्याचाच होतो हा इतिहास राहिला आहे. येणाऱ्या काळात ज्या दिवशी जनतेकडून कौल घेतला जाईल त्यादिवशी नक्कीच सत्याचा विजय होईल, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -